

पणजी: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आघाडीसाठी दरवाजे खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा आहे, ते मतदारसंघ इतर पक्षांसाठी सोडले जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका दिल्लीत झालेल्या बैठकीत मांडण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश चोडणकर, राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनात्मक पातळीवर करावयाच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या संघटनात्मक निवडणुकांबाबतही निर्णय घेण्यात आले. भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त झाले असले, तरी काँग्रेसचा प्रभाव असलेले मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडू नयेत, यावर भर देण्यात आला.
निवडणुकीस अद्याप वेळ असला तरी ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस मजबूत आहे, तेथे तातडीने संघटनात्मक बांधणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधीच्या निवडणुकांतील कामगिरी आणि पक्षाला सातत्याने मिळणाऱ्या सुमारे २५ टक्के मतांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विश्वासार्ह आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी सूचना करण्यात आली.
बैठकीत काँग्रेस नेतृत्वाने अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा सल्ला दिला. येत्या काळात सरकारविरोधी मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. युवक काँग्रेसच्या आंदोलनांच्या धर्तीवर अचानक आंदोलन करण्यावर भर देण्याचेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसची आंदोलने तीव्र होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.