
पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी केलेल्या चर्चेतच राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाचा निर्णय दडला आहे. आज मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले नाहीत, त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल केवळ चर्चेच्याच पातळीवर राहील की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री आज केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना भेटले. त्यानंतर गडकरींसोबत ते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही भेटले. महामार्ग विकास आणि त्यासाठी वास्कोत संरक्षण मंत्रालयाचे हवे असणारे सहकार्य यासंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री आज सागरमाला प्रकल्पासंदर्भात बैठकीला उपस्थित राहिले. त्यानंतर ते केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी हरियाणाला गेले. यादव यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे मुख्यमंत्र्यांसोबत काल केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यानंतर ते दुपारी दिल्लीहून निघून सायंकाळी गोव्यात पोचले आहेत.
दरम्यान, मायकल लोबो यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांनी तशी काही चर्चा आमदारांसोबत केली नाही. त्यांना अधिक सक्षम लोक मंत्रिमंडळात हवे असतील, तर ते तसा निर्णय घेतील.
आमदार नीलेश काब्राल यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याशी या विषयावर कोणीच चर्चा केलेली नाही. सभापती रमेश तवडकर यांनी मंत्रिमंडळ फेरबदल होईल, असे म्हटले असेल तर होईलही. त्यांना कोणी तशी माहिती दिली असेल. ते दिल्लीत जातात, तेव्हा त्यांना तशी माहितीही मिळाली असू शकते. आमदार दिलायला लोबो म्हणाल्या, आम्हाला त्याबाबत समजले तर जरूर सांगू. सध्या तरी आम्हांला त्याविषयी काहीच कल्पना नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.