

मडगाव: केळशी-असोळणा या महत्वाच्या पुलावरील दाेन स्पॅनमध्ये असलेली फट लोकांसाठी धाेकादायक असल्याने वार्काचे सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी आवाज उठविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित त्याची दखल घेत अवघ्या चार तासांत ही फट बुजवून टाकली.
या संदर्भातील एक व्हिडिओ आलेमाव यांनी समाज माध्यमांवर टाकला होता. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी असते. कित्येकवेळा पालक लहान मुलांना घेऊन संध्याकाळच्यावेळी फिरण्यासाठी येत असतात. या स्पॅनच्या फटीत जर लहान मुलांचा पाय पडला तर ते धोक्याचे ठरू शकते, असे आलेमाव यांनी म्हटले होते.
आलेमाव यांनी या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याची त्वरित दखल घेत आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून या स्पॅनमधील फटीत पट्टी बसवली. त्यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी सुरक्षित झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित या मागणीची दखल घेतल्याबद्दल आलेमाव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांचे आभार मानले.
आमदारांनी ‘सोशल मीडिया’वरच राहू नये!
या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांच्याशी बोललो आहे,असे सांगून वॉरन आलेमाव म्हणाले,की हा पूल बाणावली आणि वेळ्ळी या दोन मतदारसंघांना जोडणारा आहे.
या दोन्ही मतदारसंघातील आमदारांनी आता सोशल मीडियापुरतेच सिमीत न राहता रस्त्यावर उतरून लोकांना भेडसावणाऱ्या अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काम करावे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे यावे, अशी मागणीही वॉरन आलेमाव यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.