

पणजी : केंद्रीय शिक्षण मंडळाचा (सीबीएससी) दाखला देत राज्य सरकारने यंदाही सहावी ते दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू केले, परंतु सरकारच्या या निर्णयाचा प्रत्यक्षात फज्जा उडाल्याचे चित्र राज्यातील अनेक भागांतून दिसून येत आहेत.
अनेक शिक्षक जनगणना आणि पेपर तपासणीत अडकून पडल्याने त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळच नाही. त्यातच राज्यातील तापमानाचा पारा वाढतच असल्याने बहुतांशी विद्यार्थ्यांनी शाळांकडे पाठ फिरवल्याने अनेक वर्ग ओस पडले आहेत. शिक्षण तज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी यांनीही सरकारचा हा निर्णय पूर्णपणे चुकल्याचा दावा ‘गोमन्तक’शी बोलताना केला.
‘‘राज्यातील सहावी ते दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्यास गतवर्षीही आपण प्रखर विरोध दर्शवला होता, पण राज्य सरकारने यंदाही ‘सीबीएससी’चा दाखला देत या वर्गांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू केले. त्याचे परिणाम सध्या शिक्षण खाते भोगत आहे. मुळात ‘सीबीएससी’च्या भारतात आणि इतर देशांतही शाखा आहेत.
त्यांनी शैक्षणिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे ठरवले असले, तरी प्रत्येक राज्य आणि देशांतील वातावरण आणि हवामानाची स्थिती लक्षात घेऊन वर्ग सुरू केले जातात. त्यामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू–काश्मीर, कच्छसह आखाती देशांमध्ये त्यांचे वर्ग वेगवेगळ्या तारखांना सुरू होतात. याचा कोणताही अभ्यास न करता आणि एप्रिलमधील गोव्यातील परिस्थिती, हवामानाचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतला असून तो पूर्णपणे चुकला आहे’’, असे पांडुरंग नाडकर्णी म्हणाले.
दरम्यान, पहिल्या पंधरा दिवसांत उकाडा, शिक्षकांची कमतरता अशा कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जाणेच बंद केले आहे. गोव्यात स्थायिक असलेली अनेक कुटुंबे सुट्टीसाठी आपापल्या राज्यांमध्ये गेलेली आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांतही घट झाल्याने काही भागांतील वर्ग बंद करण्याची वेळ शिक्षण खात्यावर आल्याची माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली.