
पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीतून कधी येतील आणि मंत्रिमंडळ फेरबदलाचा शपथविधी कधी होईल, याकडे डोळे लावून बसलेल्यांच्या पदरी निराशा येऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीतही मंत्रिमंडळ फेरबदलाचा तिढा सुटलेला नाही, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, मुळात ही भेट त्यासाठी नव्हती. ‘माझे घर’ योजनेची भव्य सुरुवात शहा यांच्या हस्ते व्हावी म्हणून त्यांची वेळ घेण्यासाठी मी त्यांना भेटलो. त्यांनी १० सप्टेंबरनंतर गोव्यात येण्याचे मान्य केले असले तरी निश्चित तारीख दिलेली नाही.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे. शहा आमचे नेते असल्याने राजकीय चर्चा होणे स्वाभाविक होते. ती झाली; पण त्यात मंत्रिमंडळ फेररचनेवर शिक्कामोर्तब असे काही नव्हते. योग्य वेळी तो होईल.
विधानसभा अधिवेशनापूर्वी १८ जून रोजी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांच्या जागी कोण, अशी चर्चा सुरू झाली. विधानसभा अधिवेशनानंतर तीन नवे मंत्री शपथ घेतील, असे सांगण्यात येऊ लागले.
गेले वर्षभर तशी चर्चा राजकीय गोटात सुरू असते आणि माध्यमांतून त्याचे प्रतिबिंब पडत आले आहे. दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी ठरवल्याशिवाय राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल होणार नाही, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट असतानाही अशा चर्चा थांबलेल्या नाहीत.
गोमेकॉतील वाढीव जागांबाबत चर्चा
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत गोमेकॉत पदवी अभ्यासक्रमासाठी ५० वाढीव जागा मिळण्याबाबत त्यांनी चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी शहा यांची भेट घेऊन त्यांना ‘माझे घर’ योजनेची सुरुवात करण्यासाठी गोव्यात येण्याचे निमंत्रण दिले. या दोन्ही भेटींत राजकीय चर्चा झाल्या; पण त्या मंत्रिमंडळ फेरबदल कधी करावा, कोणाला वगळावे, कोणाला संधी द्यावी याचा निर्णय करणाऱ्या नव्हत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.