

पणजी: राज्य मंत्रिमंडळातील रिक्त असलेल्या मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांकडे असून, या निर्णयात पक्षाची कोणतीही थेट भूमिका नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी स्पष्ट केले. रिक्त मंत्रिपदाच्या नियुक्तीबाबत विविध स्तरांवर चर्चा आणि तर्कवितर्क सुरू असताना नाईक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबत पक्ष आणि सरकारच्या स्तरावर संयुक्त चर्चा आधीच झालेली आहे. मात्र, कोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे किंवा रिक्त पद भरायचे की नाही, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. त्यामुळे या विषयावर भाजप संघटना कोणताही दबाव टाकणार नाही किंवा हस्तक्षेप करणार नाही.
राज्यातील मंत्रिमंडळात एक पद रिक्त असल्याने त्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सत्ताधारी पक्षातील इच्छुकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार होणार का, तसेच प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधण्यासाठी कोणत्या आमदाराला संधी दिली जाईल, याबाबत विविध चर्चा रंगत आहेत.
तथापि, या सर्व चर्चांवर पडदा टाकत दामोदर नाईक यांनी हा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अधिकारक्षेत्रातील असल्याचे स्पष्ट केले. भाजपमध्ये संघटना व सरकार यांच्यात समन्वय कायम असून, मंत्रिमंडळाशी संबंधित बाबींवर आवश्यक ते संवाद झाले आहेत. मात्र, नियुक्तीची प्रक्रिया व वेळ याबाबत मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.