
जांबोटी: ब्रिटीश काळात बांधलेला मलप्रभा नदीवरील पूल कमकुवत झाल्याने त्या ठिकाणी नवा पूल बांधण्यास सुरवात झाली आहे. मे २०२५ मध्ये पुलाचे काम पूर्ण करण्याचे निश्चित केले होते; पण अवकाळी पावसामुळे काम अर्धवट राहिले. त्यामुळे बेळगाव-जांबोटी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गेला आठवडाभर कधी बंद तर कधी सुरू असा प्रकार चाललेला आहे. जांबोटी क्रॉसवर आडवा ट्रक उभा करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना पुढे प्रवेश बंद आहे.
पुलाचे काम अर्धवट आहे. पुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूने रस्ता जोडण्याचे कामही अर्धवट आहे, कामाला गती नाही. शिवाय मान्सून सक्रिय होणार असल्याने नदीत मातीचा भराव टाकून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ताही वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी लवकर खुला होणे कठीण आहे.
रस्ता बंद झाल्याने गोवेकरांचा बेळगाव प्रवास अडचणीचा ठरत आहे. अगदी जवळचा रस्ता म्हणून या मार्गाचा गोवेकर अवलंब करतात. यापूर्वी कणकुंबी परिसरातील पावसाचे पाणी म्हादई नदीत येत होते, आत्ता ते काही प्रमाणात मलप्रभा नदीत जाते, त्यामुळे पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहते. त्यामुळे तात्पुरता रस्ता डिसेंबरपर्यंत पाण्यात जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता किमान पाच ते सहा महिने बंद राहण्याची शक्यता आहे.
मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे दोन वेळा हा रस्त बंद करण्यात आला, परंतु गेल्या दोन दिवसांपासून छोट्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. पण पाऊस सक्रिय झाल्यास अवघ्या एक दोन तासांत तात्पुरता रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. रस्ता बंद झाल्यास खानापूरमार्गे बेळगावला जावे लागते, हा रस्ता किमान १५ ते १८ कि. मी. अधिक अंतराचा आहे. शिवाय हा रस्ता अरूंद आहे.
बांधकाम सुरू असलेल्या जागेला लागूनच कॉम्पॅक्टेड मातीपासून बनवलेला तात्पुरता पर्यायी पूल बांधण्यात आला आहे. गेल्या जानेवारीपासून, या तात्पुरत्या हंगामी पुलामुळे बेळगाव आणि गोवा दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू होती. गेल्या आठ दिवसांत पावसामुळे मलप्रभेची दोनवेळा पाणी पातळी वाढली आणि दोन वेळा रस्ता बंद करण्यात आला. काल-परवापासून पाणी कमी झाल्याने आणि पाऊस गायब झाल्याने रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला.
१ मलप्रभा नदीवरील पर्यायी रस्ता फक्त चारचाकी व दुचाकीसाठी खुला आहे, परंतु हवामान खात्याने १४ तारखेपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे हा रस्ता पुन्हा बंद करण्यात येण्याची शक्यता अधिक आहे.
२कारण लघु पाटबंधारे विभागाने देवाचीहट्टी, तोराळी आणि आमटे येथील पूल आणि बंधाऱ्यांवरील फळ्या काढून टाकल्यामुळे नदीतून जलप्रवाह सक्रिय झाला आहे.
३वरच्या भागात कणकुंबी ते जांबोटीपर्यंतच्या पट्ट्यात कुठेही पाऊस पडला तरी ते पाणी या नदीतच येते. त्यामुळे निश्चित पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता बंद होणार आहे.
कुसमळीजवळील मलप्रभा नदीपात्रातून सुरूकरण्यात आलेला पर्यायी मार्ग पावसाचा जोर वाढल्याने बंद झाल्यास चोर्लामार्गे गोव्याचा प्रवास करणाऱ्यांनी खानापूर-जांबोटी या मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन कर्नाटकच्या बेळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
बेळगाव- खानापूर - रामनगर - अनमोड - फोंडा किंवा बेळगाव - खानापूर - हेमाडगा - अनमोड - फोंडा असे दोन मार्ग उपलब्ध आहेत. या मार्गाने प्रवासाचे अंतर थोडे अधिक आहे. चौकशीनंतरच या मार्गावर प्रवास करायला हवा.
पावसाचा जोर वाढल्याने रहदारी बंद झाल्यास बेळगावहून येताना पिरनवाडीत चौकशी करावी, तेथे मार्ग सुरू आहे, की नाही हे समजते किंवा बेळगावकडे जाताना जांबोटी येथे चौकशी केल्यास माहिती मिळू शकते.
जांबोटीला जाण्यापूर्वी हबनट्टी गावातूनही मलप्रभेवरील पुलावर बैलूरमार्गे - कुसमळीहून बेळगावला जाणे शक्य आहे. पण रस्ता अरूंद व साधारणतः एक किलोमीटर खराब आहे. शिवाय हा रस्ता नदीला पूर आल्यास बंद होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.