
सासष्टी: गोव्याच्या किनार पट्टीवर शॅक मालकांसाठीच्या जागांच्या सीमांकनाचे काम सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे यंदा पर्यटन हंगाम लवकर सुरू होईल व त्यांच्या व्यवसायाची घडी योग्य प्रकारे बसेल म्हणून शॅक मालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सीमांकनाबरोबर शॅक मालकांना तात्पुरते परवाने देण्याचे काम सुद्धा सुरू झाले आहे. ज्या पद्धतीने कामाची सुरवात झाली आहे ते पाहता शॅक मालकांसाठी यंदाचा हंगाम समाधानकारक होणार असा विश्र्वास कार्दोज यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यात शॅक मालक संघटनेचे प्रतिनिधी, मुख्यमंत्री व पर्यंटन मंत्र्यांमध्ये या संदर्भात एक बैठक झाली व त्यावर सीमांकन व तात्पुरते परवाने यावर चर्चा करण्यात आली होती. त्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले व कामाचे जे नियोजन करण्यात आले ते योग्य दिशेने सुरू झाल्याचे शॅक मालकांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही जागांचे सीमांकन करण्यात आले नव्हते. पण यंदा गेल्या आठवड्यापासूनच या कामाला सुरवात झाली.
काही किनारपट्टीवर समुद्र खवळलेला आहे व पाण्याची पातळी किती वाढेल याचा अंदाज शक्य नसल्याने त्या ठिकाणी ही कामे अजुन सुरु झाली नाहीत. ज्या ठिकाणी सीमांकन करण्यात आले आहे तिथे शॅक मालकांनी तंबू बांधकामास सुरवात केली आहे.
शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी सरकारच्या या कामाबद्दल स्वागत केले आहे. सीमांकन व परवाने देण्याचे काम एकाच बरोबर सुरू झाल्याने आम्हा शॅक मालकांना फायदेशीर आहे, असे कार्दोज म्हणाले.
शॅक मालकांनी आणखी काही समस्या मुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांसमोर मांडल्या होत्या त्यांचे निरसन करण्याचे प्रयत्न सरकारी स्तरावर सुरू झाल्याचे कार्दोज यांनी सांगितले.
या मध्ये बेकायदेशीरपणे शॅक दुसऱ्यांना देणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, यांचा समावेश आहे. पर्यंटन खात्याने दुसऱ्यांना भाड्याने देणाऱ्या शॅक मालकांवर कारवाई करण्यास सुरवात केली असल्याचेही कार्दोज यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.