
पणजी: विरोधकांनी एकत्र येऊन युती केली तरच राज्यात भाजपचा पराभव करणे शक्य आहे, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत भाजपला पराभूत करायचे असेल तर विरोधकांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आणि जनतेलाही तेच हवे आहे हे लक्षात आल्यामुळेच आपण मनोज परब (Manoj Parab), युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा यांना फातोर्ड्यातील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले, असेही सरदेसाई यांनी सांगितले.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरदेसाई म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून भाजप सत्तेवर आहे. सरकारने राबवलेल्या अनेक धोरणांचा जनतेला फटका बसत आहे. गोव्यात गोमंतकीय नागरिकच परका होत चालला आहे. स्थानिक जनतेला संकटात ढकलून सरकार परप्रांतीयांचे कल्याण करीत आहे. त्यामुळे जनता भाजप सरकारला कंटाळलेली आहे. परंतु, भाजपकडे भक्कम संघटन असल्यामुळे ते निवडणुका जिंकतात. अशा स्थितीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मतविभाजन टाळल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे.
गोवा फॉरवर्ड (Goa Forward) आणि ‘आरजी’ हे दोन्ही स्थानिक पक्ष. गोव्याच्या हितासाठी दोन्ही पक्ष मांडत असलेली बहुतांशी भूमिका सारखीच आहे. त्यामुळे जनता आमची युती स्वीकारेल, यात दुमत नसल्याचे सरदेसाई म्हणाले. विरोधी पक्षांची भविष्यात युती होईल की नाही हे माहीत नाही. परंतु, विरोधकांतील ज्येष्ठ आमदार या नात्याने आपण त्याची सुरुवात केली आहे, असेही सरदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेस आमदार आणि मनोज परब यांना फातोर्ड्यातील कार्यक्रमाला बोलावल्यानंतर आम आदमी पक्षाचे राज्य निमंत्रक अमित पालेकर यांनी आपल्याला बोलावले नसल्याची प्रतिक्रिया दिली. मुळात विरोधकांच्या युतीचा विषय याआधी पालेकरच उपस्थित करीत होते. गोवा आणि गोमंतकीयांच्या हितासाठी विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन ते वारंवार करीत होते. परंतु ‘आप’च्या श्रेष्ठींची भूमिका मात्र पालेकरांच्या विरोधात आहे. त्या पक्षाच्या प्रभारी आतिषी यांनी तर सुरुवातीलाच चाळीसही मतदारसंघांत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली. त्यामुळेच आपण पालेकर यांना कार्यक्रमाला बोलावले नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
युती, उमेदवारांची घोषणा यासाठी काँग्रेस श्रेष्ठी नेहमीच वेळकाढूपणा करतात. त्याचा फायदा वारंवार भाजपला मिळतो, हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलेले आहे. २०२७ मध्ये भाजपचा पराभव करायचा असेल तर काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्षांनी आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीआधी युती करणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्हा पंचायत निवडणुकीतही भाजपचा विजय निश्चित आहे, असेही विजय सरदेसाई म्हणाले.
फातोर्ड्यातील कार्यक्रमात मी, काँग्रेस आमदार आणि मनोज परब एकत्र आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना खटकले. त्यामुळेच त्यांनी या कार्यक्रमावर भाष्य केले. देव आणि नरकासुराचा उल्लेख करत त्यांनी आमच्यावर टीकास्र सोडले. परंतु त्यांच्याच पक्षाने २०११ मध्ये ज्यांच्यावर नरकासुराचा शिक्का मारून विजय मिळवला, त्यातील अनेक नरकासुर आजही त्यांच्या सरकारात आहेत. नरकासुर नेमके कोण, हे गोमंतकीय जनता २०२७च्या विधानसभा निवडणुकीत ठरवेल आणि त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा सरदेसाई यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.