येत्या महिनाभरात ८०० मिमी. पाऊस पडला आणि पावसाने विश्रांती घेतली तर राज्यभरात दरडी कोसळण्याचा धोका आहे. सध्या १ हजार मिमी. पाऊस जमिनीत जिरला असल्याने जमीन भुसभुशीत झाली आहे. अशा स्थितीत पावसाने विश्रांती घेतली तर साट्रे-सत्तरीतील घटनेप्रमाणे भूस्खलन होऊ शकते, अशी भीती संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी व्यक्त केली आहे.
कामत यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, सध्या पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेतला तर या महिन्यात काहीही होऊ शकते.
दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून मंदावलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला असून मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली आहे. ४ जूनला मॉन्सून (Monsoon) दाखल झाल्यापासून आतापर्यंत महिन्याभरात राज्यात १०५७.२ मिमी म्हणजेच एकूण ४१.६१ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.
एकंदरीत राज्यात पावसाने ४० इंचांचा टप्पा ओलांडला असून पावसाने आता अर्धशतकाकडे वाटचालीला सुरवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने देशभरात जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
राज्यात मागील २४ तासांत सरासरी एकूण ४२.७ मिमी (१.६८) इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. मागील २४ तासांत सर्वाधिक ११७.४ मिमी म्हणजेच ४.६२ इंच इतक्या पावसाची नोंद वाळपईत केली.
कामत म्हणाले की, महिनाभरात पडलेला पाऊस हा जलसुरक्षिततेसाठी महत्त्वाचा होता. आता यापुढे २४ तासांत २५० मिमी. पाऊस झाला तर शहरे पुरात बुडू शकतात. ऑगस्ट २०२१ मध्ये साट्रे येथे डोंगर कोसळले होते. दरडी खाली आल्या होत्या. आताही ८०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला तर दरडी कोसळण्याचा धोका आहे. आता या महिन्यात पावसाने विश्रांती घेतली नाही, तरच राज्य भूस्खलनाच्या संकटांपासून वाचू शकते.
राज्यात पुढील चार दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली असून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.