
सासष्टी: फातोर्ड्यातील विकासकामांचे श्रेय घेण्यास सध्या माजी आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व गोवा फॉरवर्डचे विद्यमान आमदार विजय सरदेसाई यांच्यामध्ये चढाओढ लागली असून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. फातोर्डा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात दामू नाईक यांनी विकासकामांचे श्रेय स्वतः घेतल्याने गोवा फॉरवर्डने नगरसेवकांमार्फत विकास केला, तर तीनवेळा पराभूत का झाला असा खडा सवाल दामू यांना करण्यात आला होता.
दामू नाईक यांनी मडगावात पत्रकारांकडे सांगितले, की आपण आमदार असतानाच फातोर्ड्यात विकासकामे झाली व जर कोणीही हे मान्य करीत नसेल, तर खुल्या चर्चेस मी अजूनही तयार आहे. दामू नाईक यांनी पुढे स्पष्ट केले की, आपला पराभव केवळ मतदारसंघाचे डिलिमीटेशन केल्यामुळे झाला. हाउसिंग बोर्ड कुडतरीत, तर कोंब परिसर मडगाव मतदारसंघात समाविष्ट झाला. तरीसुद्धा भाजपची मते कमी झाली नाहीत, याउलट ती वाढत गेली.
लोकसभा निवडणुकीतसुद्धा भाजप उमेदवाराला ९५०० पेक्षा जास्त मते मिळाली, असे दामू नाईकयांनी सांगितले.फातोर्ड्यातील अल्पसंख्याकांना झालेला विकास पटवून देण्यात कदाचित आम्ही कमी पडलो असेल हे त्यांनी मान्य केले. तरीसुद्धा आपण पळपुटेपणा केला नाही. अजूनही टक्कर देत आहे. २०२७ मध्ये आपण स्वतः उमेदवार असू शकतो, पण आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा कायदा नाही. परिस्थितीप्रमाणे पक्ष काय तो निर्णय घेईल.
आपण प्रदेशाध्यक्ष आहे व पक्षकार्याची संपूर्ण गोव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तरीसुद्धा फातोर्डा मतदारसंघ बलवान करण्याची आपली जबाबदारी आहे, असे दामू नाईक म्हणाले. जी परिस्थिती गत १० ते १५ वर्षांत होती ती आता नाही. तेव्हाचे युवक आता मतदार झाले आहेत. त्यांना काय खरे व काय खोटे हे कळावे म्हणून आपण हे सांगत आहे. जी वडीलधारी माणसे आहेत, त्यांना सत्य माहीत आहे, असेही दामू नाईक यांनी सांगितले.
आपण इतरांप्रमाणे दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय स्वतः घेत नाही, पण आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत भूमिगत वाहिनी, सिवरेज पाइपलाइन या कामांची प्रक्रिया सुरू झाली होती. ११ नाले बांधण्यात आले होते. जिल्हा इस्पितळ, रवींद्र भवन आपण आमदार असताना पूर्णत्वास गेले. माडेल, दवंडे येथील लहान पूल, ११ नाल्यांची कामे आपल्या आमदारकीच्या काळात झाली, असेही दामू नाईक यांनी सांगितले.
शेतजमिनीवरून आपल्यावर टीका करण्यात येते, पण खरे पाहता विजय सत्तेत असतानाच शेतजमीन शेतकऱ्यांच्या हातातून गेली. तेव्हा ते गप्प का राहिले, असा सवाल दामू नाईक यांनी उपस्थित केला. केवळ पोलिस स्थानक सुरू केले ते चांगलेच झाले, पण पोलिस स्थानकाची खरी गरज होती हाउसिंग बोर्डमध्ये. तसा प्रस्ताव आपण मांडला होता, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.