

पणजी: दाबोळी विमानतळावरून शनिवारी इंडिगोची किमान १४ देशांतर्गत उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अचानक विमाने रद्दची घोषणा झाल्याने अनेक प्रवासी ताटकळत विमानतळाबाहेर उभे राहिले, तर राज्यातील व्यस्त पर्यटन हंगामावरही याचा थेट परिणाम झाला. दरम्यान, फ्लाय ९१ विमान कंपनीने गोवा हैदराबाद मार्गावर अतिरिक्त उड्डाणे सुरु केली आहेत.
उड्डाण रद्द झाल्याची पूर्वकल्पना नसल्याने मोठ्या संख्येने प्रवासी नेहमीप्रमाणे दाबोळी विमानतळावर दाखल झाले. पर्यटन उद्योगाला ही परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे, कारण वर्षातील सर्वाधिक पर्यटकांची वर्दळ असलेल्या काळात उड्डाणांतील गोंधळाचा मोठा फटका बसू शकतो.
गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष जॅक सुखीजा यांनी इंडिगोच्या विमानसेवा व्यवस्थापनातील विस्कळीतपणामुळे पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली.
दरम्यान, शुक्रवारीदेखील इंडिगोची ३८ पैकी तब्बल ३१ उड्डाणे रद्द झाली होती. दरम्यान, विमानतळाच्या अधिकृत एक्स हँडलवरील पोस्टनुसार, रद्द केलेल्या उड्डाणे हैदराबाद, अहमदाबाद, मुंबई, कोचीन, कोलकाता, बंगळुरू, दिल्ली आणि इंदूरसाठी नियोजित होती. ही सर्व उड्डाणे शनिवारी दुपारपर्यंत रद्द करण्यात आली होती.
‘इंडिगो’ कंपनीचा हवाई वाहतूक गोंधळ वाढल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप केला आहे. विमानसेवा रद्द झाल्यामुळे त्रासलेल्या सर्व प्रवाशांना कंपनीने प्रवासभाडे रविवारपर्यंत (ता.७) परत करावे, असा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. या वाहतूक संकट काळामध्ये संधीसाधूपणे अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करणाऱ्या कंपन्यांना ठरलेल्या भाड्यापेक्षा वाढीव भाडे आकारल्यास कारवाई करण्यात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.