![CM Pramod Sawant](http://media.assettype.com/dainikgomantak%2F2023-09%2F55d0bfc7-5403-41e2-92cc-e2d739cb686a%2Fcm_sawant.png?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
CM Pramod Sawant: केंद्रात आलेल्या बहुतांश सरकारांनी तसेच काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत गोव्याला दुय्यम स्थान दिले. गोव्याला आतापर्यंत महाराष्ट्राचा एक जिल्हा म्हणूनच गणले जात होते. त्यामुळे गोवा राज्याचा अपेक्षेप्रमाणे विकास होऊ शकला नाही.
परंतु केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्याला खऱ्या अर्थाने स्वतंत्र अस्तित्व लाभले आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज साखळी येथे केले.
महाविद्यालयात युवा महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर नेहरू युवा केंद्राचे अधिकारी कालिदास घाटवळ, प्राचार्य मेंडिस, नितीन सावंत, उमाकांत सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. गोव्याला पूर्वी महाराष्ट्राच्या बरोबरीने विविध स्पर्धांत सहभागी केले जात असे.
मात्र, मोदी तसेच भाजपमुळे आज गोव्याची स्वतंत्र ओळख झालेली असून गोवा राज्य अनेक क्षेत्रांत चमकत आहे. काँग्रेसने सतत गोव्याला दुय्यम स्थान दिले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आज देशाला गोवा राज्याने अनेक क्षेत्रात वेगळी ओळख दिली असून युवा पिढीला प्रोत्साहन मिळत आहे. गोव्यातील युवा देश व विदेशांत मोठी भरारी घेत आहेत.
आज पंतप्रधान मोदींनी प्रत्येक घटकाचा विकास साधलेला असून विकसित भारतासाठी युवकांनी आपली सर्व ऊर्जा देताना अनेक क्षेत्रांत उत्तुंग यश व योगदान द्यावे.
आजही काही लोक गुलामगिरीची मानसिकता बाळगून वावरत असल्याची टीका त्यांनी केली. कालिदास घाटवळ यांनी महोत्सव आयोजनाची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी इतिहास चाळावा!
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली. काँग्रेस पक्षाचे योगदान जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी इतिहासाची पुस्तके वाचावीत, असे त्यांनी म्हटलेे. भ्रष्टाचार,बेरोजगारी, महागाई ही केंद्र व राज्याची भेट आहे, असे अमित पालेकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.