Goa: 'सर्वधर्म समभावाच्या वृत्तीनेच गोमंतकीय जगतात'! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; राज्यात टॅक्सी माफिया नसल्याचा केला दावा
पणजी: गोव्यावर ४५० वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केले. परंतु, गोमंतकीय जनतेने आपली संस्कृती कायम अबाधित ठेवली. गोव्यात हिंदू–ख्रिश्चन असा कोणताही भेद नसून, सर्वधर्म समभावाच्या वृत्तीनेच गोमंतकीय जगतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले.
गोव्यात मंदिरांप्रमाणेच चर्चनाही महत्त्व आहे. गोवा मुक्तीत हिंदू आणि ख्रिश्चन या धर्मांतील स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश होता. पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर गोमंतकीयांनी राज्यातील सर्वधर्म समभाव कायम जपून ठेवला. त्यामुळे आजही दोन्ही धर्मियांच्या सणांमध्ये दोन्ही धर्मांचे लोक सहभागी होतात. राज्यात हिंदू–ख्रिश्चनांमध्येही कधीही तंटे होत नसून, यापुढेही ते होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
गोवा पर्यटन राज्य असल्यामुळे केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक त्या साधनसुविधा उभारण्याचे प्रयत्न आपण गेल्या सात वर्षांपासून सातत्याने करीत आहे. राज्यातील टॅक्सी व्यवसायावरून सोशल मीडियावरून चुकीचा गोष्टी दाखवण्याचे प्रयत्न होत आहेत. टॅक्सी व्यवसायात काही समस्या आहेत.
परंतु, राज्यात टॅक्सी माफिया नाहीत. आगामी काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून टॅक्सी व्यवसायात अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. गोव्यातील कायदा–सुव्यवस्थेवरून विरोधक नाहक टीका करीत आहेत. पण, गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित राज्य आहे. पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे प्रयत्न योग्य पद्धतीने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तिसऱ्या जिल्ह्यात राजकारण नाही!
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचून त्यांचा विकास व्हावा, यासाठीच राज्यात कुशावती या तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. यात कोणतेही राजकारण नाही. परंतु, विरोधक यावरूनच सरकारवर विनाकारण टीका करीत आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
मी मुख्य सेवक!
मी मुख्यमंत्री नाही, राज्याचा मुख्य सेवक आहे. तीच भावना मनात ठेवून राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न मी करीत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. भाजपात मी अगोदरपासूनच सक्रिय होतो. सोबतच सामाजिक कार्यही करीत होतो. आपले वडील राजकारणात होते. त्यांनी पंचायतीपासून विधानसभेची निवडणुकीही लढवली होती. परंतु, त्यांना केवळ जिल्हा पंचायत निवडणुकीत यश मिळाले होते.
नंतरच्या काळात डॉक्टर या नात्याने लोकांची सेवा करीत असतानाच माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी मला राजकारणात आणले. राजकारणात आल्याशिवाय लोकांची कामे होत नसतात हे लक्षात घेऊन आपण काम करण्यास सुरुवात केली. भाजपने दिलेल्या संधीमुळे आपण आमदार, सभापतीपदावरून मुख्यमंत्रीपदी मजल मारू शकलो, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

