पणजी : चोडण-रायबंदर फेरीवर शुक्रवारी सकाळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे चांगलेच हाल झाले. चोडण आणि रायबंदर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळाल्या. त्यातच रायबंदर फेरीच्या ठिकाणी नेहमी असणारे पोलीसही आज गायब असल्याने पुरता गोंधळ उडाल्याचं चित्र होतं.
चोडण ते रायबंदर मार्गावर शुक्रवारी सकाळी फेरीबोट नसल्याने मोठा गोंधळ उडाला. सुट्टीमुळे फेरींची संख्या कमी असल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीसही (Police) गायब झाल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. गर्दीच्या वेळी अशाप्रकारे वाट पाहायला लागल्याने कामावर जाणाऱ्या लोकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दुचाकीचालकांनी बाहेर पडण्याच्या मार्गावरही गाड्या लावल्याने फेरीमधून गाड्या बाहेर पडण्यास उशीर होत असल्याचं चित्र होतं. साहजिकच याचा परिणाम एकंदर फेरीबोट वाहतुकीवर झाला.
दुचाकींची संख्या जास्त असल्याने कारना फेरीबोटमध्ये प्रवेशच मिळत नव्हता. त्यामुळे तासभर वाट पाहूनही फेरीसाठी ताटकळत राहण्याची वेळ वाहनचालकांवर आली. चोडणमध्ये वाहनांच्या रांगा (Traffic) लागल्या होत्याच मात्र रायबंदर फेरीजवळील अरुंद आणि एकेरी मार्गावर गाड्यांच्या रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडीही पाहायला मिळाली. पोलिस काहीकाळ येऊन फक्त पाहून गेले मात्र त्यांनी ही कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. या फेरीचा वापर मुख्यत्वे डिचोलीतून (Bicholim) पणजीत येणारे लोक करतात. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना ऐन सणादिवशी कोंडीचा सामना करावा लागला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.