

आगोंद: काणकोणचे काँग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जर जानेवारी २०२६ पूर्वी भरपाई मिळाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे काणकोणसह संपूर्ण गोव्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना या संकटाचा फटका बसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सरकारने प्रतिहेक्टर ४० हजार रुपये भरपाई जाहीर केली असली, तरी ती अपुरी असून अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, असे भंडारी यांनी नमूद केले. डिसेंबरपर्यंत मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कृषी संचालकांनी १५ जानेवारीपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन दिले असून ते त्वरित अमलात आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कृषी कार्ड नसलेल्या; पण प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, तसेच भविष्यात आपत्तीवेळी तातडीची मदत मिळण्यासाठी कायमस्वरूपी धोरण तयार करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.