
वाळपई: २०२७ साली गोवा विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने आतापासून भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. वाळपई मतदारसंघात ग्रामीण भागात प्रत्येक बुथ पातळीवर सक्रियपणे काम करून बुथ संघटना आणखीन मजबूत करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. वाळपई मतदारसंघात विविध ठिकाणी अभियान उपक्रमात आरोग्यमंत्री सहभागी झाले होते. त्यावेळी धावे-पोळेकरवाडा येथे बुथ मंडळ समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, शुक्रवारी (ता.११) पहिल्या उपक्रमात ब्रह्माकरमळी येथील श्री ब्रह्मदेव मंदिराच्या परिसरातील नैसर्गिक झरीच्या तळीची साफसफाई आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. त्यावेळी राणे यांनी ब्रह्मदेव मंदिराचे दर्शन घेतले.
तसेच यावेळी ब्रह्मदेव समितीचे सर्व पदाधिकारी, वाळपई भाजप मंडळ अध्यक्ष तथा नगरगावचे उपसरपंच रामा खरवत, सरचिटणीस (प्रभारी) प्रसाद खाडीलकर, समाजकार्यकर्ते विनोद शिंदे, नगरगाव सरपंच उर्मिला गावस, पंच राजेंद्र अभ्यंकर, पंच देवयानी गावकर, पंच संध्या खाडीलकर, पंच मामू खरवत, उसगाव जि.पं.स. उमाकांत गावडे, रामनाथ डांगी, वाळपईच्या नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, नगरसेवक शेहझीन शेख, सय्यद सरफराज, गुळेली सरपंच नितेश गावडे आदी विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, नागरिक, वाळपई भाजप मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांची उपस्थिती होती.
हल्लीच सत्तरी तालुक्यातून पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय रेफ्री म्हणून निवड झालेल्या ब्रह्माकरमळी येथील यशवंत गावकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर नगरगाव-आंबेडे येथे तिठ्यावरील नाना यांच्या चहा स्टॉलवर चाैैपाल बैठक झाली. यावेळी राणे यांनी स्वत: भाजप कार्यकर्त्यांना चहा, वडा वितरित केला. यावेळी युवा कार्यकर्ते, महिला यांच्याशी चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या.
नगरगाव-आंबेडे सरकारी माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी विश्वजीत राणे यांच्याशी चर्चा करून मुलांसाठी दोन बसगाड्या सुरू करण्याची मागणी केली. राणे यांनी त्याची पूर्तता करणार असल्याचे स्पष्ट केले. युवकांनी आता भाजपच्या कार्यात सहभागी होऊन विकासाला चालना देण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांनतर धावे-पोळेकरवाडा येथे सरकारी योजना घेत असलेल्या महिलावर्गाशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर धावे-पोळेकरवाडा बुथ समितीसोबत बैठक घेतली. यावेळी बुथ समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात भाजपची बुथ समिती अगदी सक्रियपणे कार्यरत राहिली पाहिजे. त्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्याशी नेहमीच संपर्कात राहून समस्या जाणून घेतल्या पाहिजेत; कारण गावातील प्रत्येक मतदार भाजपची ताकद आहे. ग्रामीण भागातील मतदार नेहमीच भाजपसोबत खंबीरपणे उभा राहिला आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बूथ समितीने पूर्ण ताकदीने कामाला लागावे.
विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.