
पणजी: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री दिगंबर कामत यांनी अलिकडेच केलेले विधान त्यांच्याच अंगलट आल्याचे दिसत आहे. कामत यांच्या विधानाने सोशल मिडियावर विविध चर्चांना उधाण आले असून, विरोधकांनी देखील त्याचे भांडवल करण्यास सुरुवात केली आहे. '१५ साल तक गोवा में भाजप आ नही सकती' (पुढील १५ वर्षे गोव्यात भाजप सत्तेत येऊ शकत नाही) असे एक विधान कामत यांनी संदर्भ आचार्य प्रमोद कृष्णमान यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन म्हणाले.
अनावधानाने किंवा नकळत का होऊन कामत यांनी केलेल्या या विधानाचे आता विरोधी पक्षाने भांडवल करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, "मंत्री कामत एकदम बरोबर बोलले आहेत, कारण २०२७ मध्ये गोव्यात भाजपचे नाही, तर काँग्रेसचे सरकार निवडून येईल."
हे विधान कामात यांच्या पूर्वीच्या राजकीय भूमिकेशी जोडले जातेय. काही वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना कामत यांनी 'देवाने स्वप्नात येऊन पक्षबदलाचा संकेत दिला' असे विधान केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर त्यावेळीही मोठी टीका झाली होती. आता याच गोष्टीचा आधार घेऊन सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू झालीये.
एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे की, "ज्या देवमाणसाने देवाचे नाव वापरून भाजपमध्ये प्रवेश केला, तोच आता म्हणतोय की पुढील १५ वर्षांसाठी भाजप गोव्यामधून गायब होईल. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनाच याची तयारी करायला सांगितली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुभाष शिरोडकर आणि इतर भाजप आमदार टाळ्या वाजवून त्यांच्या स्वतःच्या निवृत्तीच्या योजनेलाच प्रोत्साहन देत आहेत."
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "पक्षांतर करणाऱ्या दिगंबर कामत यांनी एकदा सांगितले होते की देवाने त्यांना भाजपमध्ये येण्यास सांगितले. आता तेच म्हणतात की पुढील १५-२० वर्षे भाजप गोव्यात आणि देशात सत्तेत परत येणार नाही." यावरून असे दिसते की देवानेच त्यांना वोट चोरी आणि पक्षांतर करणाऱ्या पक्षाबद्दल उघडउघडपणे खरं बोलण्यासाठी प्रवृत्त केलेय."
या विधानावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक भाजप मंत्री उपस्थित होते. विशेष म्हणजे, कामत यांनी हे विधान केले असताना डॉ. सावंत यांनी टाळ्या वाजवून त्याचे समर्थन केले. या घटनेवरूनही सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांवर टीका होत आहे. एका युजरने म्हटले की, "दिगंबर कामत यांच्या भाजपविरोधी विधानाचे समर्थन करून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपला खरा चेहरा दाखवला.
जो मुख्यमंत्री आपल्या पक्षासोबत ठामपणे उभा राहिला पाहिजे, तोच त्या माणसापुढे झुकतोय, ज्याने एकेकाळी काँग्रेसमधून पक्षांतर केले. ही भाजपप्रती निष्ठा नाही, तर काँग्रेसच्या षडयंत्रापुढे शरणागती आहे. गोवा आज भाजपच्या हातात नसून, भाजपचा मुखवटा घालून काँग्रेस-नियंत्रित बाहुल्यांचा हा खेळ सुरु आहे"
दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनीही या प्रकरणात उडी घेत, कामत यांचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. "पक्षांतराचे राजा दिगंबर कामत, ज्यांनी काँग्रेस आणि जनतेचा विश्वासघात केला, ते मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर सत्य कबूल करतात की भाजप पुढील १५ वर्षे सत्तेत येणार नाही."
कामतांच्या या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा एक सूर देखील समाज माध्यमांतून समोर येत आहे. मंत्री कामत यांनी "आ नही सकती" असे न म्हणता "हार नाही सकती" (पराभूत होऊ शकत नाही) असे म्हटले होते. मात्र, ते नीट ऐकू न आल्यामुळे त्याचा अर्थाचा अनर्थ झाला, असा दावा केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.