
पणजी: भाजप, मगोप आणि सरकारला समर्थन देणाऱ्या तीन अपक्ष आमदारांच्या बैठकीत आज कोमुनिदाद जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे आणि आल्वारा जमिनींचा विषय गाजला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक पणजीतील एका हॉटेलमध्ये घेण्यात आली.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामू यांची निवड झाल्यानंतर आमदारांशी ओळख करून देण्यासाठी या बैठकीचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सध्या प्रदेश पातळीवर अध्यक्ष सोडल्यास अन्य कोणी पदाधिकारीच नसल्याने केवळ प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीस उपस्थित प्रदेशाध्यक्ष दामू यांनी दोन आमदार किंवा आमदार-मंत्र्यांच्या जाहीर वादामुळे सरकारची तसेच पक्षाची प्रतिमा मलीन होते, यावर जोरकसपणे बोट ठेवले. यासाठी त्यांनी बायंगिणी येथील कचरा प्रकल्पावरून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि आमदार राजेश फळदेसाई यांच्यातील वाक् युद्धाचे उदाहरण दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी असे वाद वा मतभेदाचे मुद्दे असतील तर ते माझ्याकडे मांडावेत, असा सल्ला आमदार-मंत्र्यांना दिला.
पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी कोमुनिदाद जमिनीवरील बांधकामे नियमित करण्याचा विषय मांडला. त्यांना चिखली कोमुनिदादच्या जमिनीवर केलेली बेकायदा बांधकामे नियमित करून हवी होती. त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी मानाही डोलावल्या. त्याचबरोबर आल्वारा जमिनींचा मुद्दाही चर्चेला आला. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर आमदारांना काय वाटते, त्याविषयीची त्यांची मते जाणून घेतली. त्यावर त्यांनी उघडपणे भाष्य करणे टाळले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेले विश्वजीत राणे, सभापती रमेश तवडकर आणि आमदार मायकल लोबो हे या बैठकीला उपस्थित नव्हते.
मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार जीत आरोलकर, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटये, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि आंतोन वाझ हे या बैठकीला उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.