

डिचोली: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावरील जंक्शनवर बसविण्यात आलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा अद्याप कार्यान्वित न झाल्याने ती केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. ही यंत्रणा नेमकी कधी सुरू होणार, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाढत्या अपघातांमुळे वादग्रस्त ठरलेल्या या बगलमार्गावरील वाठादेव आणि व्हाळशी या दोन्ही जंक्शनवर सुमारे तीन महिन्यांपूर्वी वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. मात्र, अद्यापही ते सुरू करण्यात आलेले नाहीत, ही बाब नागरिकांमध्ये नाराजी निर्माण करणारी ठरत आहे.
६ जून २०२४ रोजी वाठादेव ते व्हाळशी या चौपदरी बगलमार्गाचे लोकार्पण झाले होते. बगलमार्ग सुरू झाल्यानंतर अपघातांची संख्या वाढल्याने हा मार्ग सतत चर्चेत राहिला आहे. विशेषतः वाठादेव आणि व्हाळशी ही दोन्ही जंक्शन्स अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत.
आतापर्यंत या बगलमार्गावर सुमारे २० अपघात घडले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. व्हाळशी जंक्शन तर अत्यंत असुरक्षित मानले जात आहे. वाहनचालक आणि स्थानिकांच्या मागणीनुसार काही महिन्यांपूर्वी रंब्लर्स काढून त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. मात्र, त्यातूनही अपघातांवर अपेक्षित नियंत्रण मिळालेले नाही.
सध्या दोन्ही जंक्शनवर वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली असली, तरी ती सुरू करण्यास विलंब होत असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.