

डिचोली : उद्या करीत अखेर एकदाचा पाऊस सक्रिय झाल्याने, पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता सुखावला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे डिचोलीत सर्वत्र शेतीकामांना चालना मिळाली आहे.
अर्धाअधिक जून महिना कोरडा गेल्याने पावसाकडे डोळे लावून असलेले शेतकरीही आता मरगळ झटकून शेतीत उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. डिचोली हा कृषिप्रधान तालुका. तालुक्यातील साळ, मेणकुरे, धुमासे, लाटंबार्से, बोर्डे, मये, पिळगाव, नार्वेसह बहुतेक भागात दरवर्षी खरीप भातशेती लागवड करतात.
यंदाही शेतकरी खरीप भातशेती करण्याच्या तयारीत असताना मोसमी पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकरी विवंचनेत होते. सध्या जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी शेतीत उतरले आहेत. सध्या मयेसह पिळगाव आदी भागात नांगरणी आदी मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. यंदा भात लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी खातेही सज्ज झाले असून, अनुदान तत्वावर भातबियाणेही वितरीत करण्यात येत आहे.
पुढेही पाऊस हवा मुबलक
यंदा मॉन्सूनच्या सुरवातीलाच पावसाने दगा दिला. त्यामुळे जवळपास महिनाभर शेतीकामे लांबणीवर पडली आहेत. सध्या समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे आशादायक वातावरण निर्माण झाले. सध्याच्याप्रमाणे पर्जन्यवृष्टी होत राहिली, तर तरवा लावणीची कामे करण्यास मदत होणार आहे. पुढील आठ दिवसांनी या कामांना हात घालण्यात येणार आहे. पावसाने जर उपकार केले, तर यंदा भातपिकही समाधानकारक येणार, असा आशावाद मये येथील शेतकरी विश्वास चोडणकर आणि सखाराम पेडणेकर यांनी व्यक्त केला.