
पणजी: चोडण येथील धक्क्यावर नांगरलेली ‘बेती’ फेरीबोट बुडल्याची घटना घडून काही काळ लोटला असला तरी, या घटनेच्या मुळाशी नेमकं काय कारण होतं, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेलं नाही. नदी परिवहन खात्याने या प्रकरणी अंतर्गत चौकशी पूर्ण करून अहवाल सरकारकडे सादर केला असला, तरी त्या अहवालातील निष्कर्ष, दोषी ठरवलेली व्यक्ती किंवा जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का, याविषयी कुणीही खुलेपणाने बोलण्यास तयार नाही.
या घटनेच्या रात्री ‘बेती’ ही फेरीबोट धक्क्यावर नांगरलेली असतानाच ती अचानक बुडाली. त्यावेळी बोटीत कर्मचारी उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे बोटीमध्ये पाणी शिरल्यामुळे तिचं वजन वाढलं आणि ती एका बाजूला झुकत गेली. शेवटी तिने पूर्णपणे पाण्यात बुड घेतली. ही प्राथमिक माहिती समोर आली होती.
मात्र, यानंतर काही कर्मचाऱ्यांकडून बोटीत योग्य देखभाल न केल्याचा आणि निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला. तरी विभागाने “चौकशीनंतरच अंतिम निष्कर्ष देऊ,” अशी भूमिका घेतल्यामुळे स्पष्टता आली नाही.
बुडालेली फेरीबोट पाण्याबाहेर काढण्यासाठी सरकारला मोठा खर्च करावा लागला. या कामासाठी लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी वापरावा लागल्याने निधीच्या अपव्ययाबाबत टीका होत आहे. चौकशी अहवाल सरकारकडे सादर झाला असला तरी त्यामध्ये दोषी व्यक्ती, अधिकारी यांची कोणतीही माहिती सरकारने जाहीर केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि स्थानिक पातळीवर अस्वस्थता वाढली आहे.
या प्रकरणी नेमकी कोणती व्यक्ती जबाबदार आहे? देखभालीची कोणती त्रुटी होती? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही अनुत्तरित आहेत. परिणामी, या अहवालात काय निष्कर्ष नोंदवले गेलेत आणि नेमकी जबाबदारी कुणावर निश्चित करण्यात आली आहे का, याबाबत पारदर्शकतेची मागणी आता होऊ लागली आहे. सार्वजनिक निधीच्या उपयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे, हा अहवाल त्वरित जाहीर करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.