

फोंडा: बेतोडा पंचायत क्षेत्रातील आशेवाडा येथील पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नळ कोरडे पडले असून सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेची खिल्ली उडाली असल्याचे दिसून येत आहे.
४-५ दिवसांतून येणारा टँकर केवळ दोन बॅरेल्स पाणी देत असल्याने स्थानिकांची सध्या तारांबळ उडाली आहे. बांधकाम खात्याने निदान दिवसातून एकदा टँकरमधून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
गेल्या ४ सप्टेंबरपासून आशेवाडा-बेतोडा येथे नळ कोरडे पडले आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांनी बांधकाम खात्याला निवेदनही दिले होते. परंतु, अजूनही नळाद्वारे पाणीपुरवठा केला गेलेला नाही. संबंधित खात्यामार्फत पाणी इतर ठिकाणी वळविण्यात आल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत.
पाणी विभाग खात्याला माहिती दिल्यानंतर टँकर पाठविले जातात मात्र, टँकर ४-५ दिवसानंतर येत असल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. टॅंकरने पाणी घातल्यानंतर विद्यार्थी तसेच लहान मुलांना आंघोळ करावी लागत आहे. पाणी नसल्याने आम्हाला दररोज आंघोळ करणेही शक्य नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पाण्यामुळेच लहान मुले आजारी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. टँकरमधून पुरवठा होणारे पाणी फक्त एका घराला दोन बॅरेल इतकेचे दिले जाते. त्यातही काही गुरे व कुत्रे पाणी पिण्यासाठी भरलेल्या पाण्याच्या बॅरेलवर ताव मारताना दिसून येतात. मते मागण्यासाठी लोकप्रतिनिधी येतात पण मतदान संपले की ते परिसरात फिरकतही नाहीत. आम्ही कसे जगतो, आमचे प्रश्न, समस्या कोणत्या आहेत, याकडे ते लक्षही देत नाहीत, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.