
पणजी: बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘श्रमधाम संकल्पने’तून तिसऱ्या टप्प्यातील ३० घरांच्या चाव्या येत्या २३ रोजी दुपारी ३ वा. विशेष अधिवेशनात गरजू कुटुंबांना सुपूर्द करण्यात येणार आहेत. कला अकादमीत होणाऱ्या या सोहळ्यास मुख्यमंत्री, केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रातील स्नेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तवडकर म्हणाले की, मागील दोन वर्षांत ‘श्रमधाम’अंतर्गत आम्ही गरिबांना घरे उपलब्ध करून दिली आहेत. पहिल्या टप्प्यात २०, दुसऱ्या टप्प्यात २०, तर आता तिसऱ्या टप्प्यात आणखी ३० घरे देत आहोत. म्हणजे दोन वर्षांत एकूण ७० घरांचे बांधकाम पूर्ण करून ती कुटुंबांना दिली आहेत.
प्रत्येक घर हे किमान ७० चौ. मीटरचे असून त्यासाठी साधारण १५ लाख रुपये खर्च येतो. मात्र, आम्हाला पैशांची मागणी करावी लागली नाही. समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतःहून सहकार्य करत असल्याने आमचे कार्य खूपच सोपे झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
तवडकर म्हणाले, ही संकल्पना नवी नाही तर परंपरेतून आलेली आहे. पूर्वी गावात गावपण जपण्याची परंपरा होती. आपण सुखी राहावे व गावालाही जगवावे, ही संस्कृती पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
५ हजार स्वयंसेवकांचे जाळे उभारणार!
काणकोण परिसरात एक हजार स्वयंसेवक आधीच कार्यरत आहेत. राज्यभरात ५,००० स्वयंसेवकांचे जाळे उभारण्यावर आम्ही भर दिला आहे. मागील दोन महिन्यांपासून काणकोण ते पेडणेपर्यंत समाजातील संवेदनशील व्यक्तींना ‘श्रमधाम’च्या कार्याची माहिती देण्यासाठी संवाद साधला गेला. आमच्या विचारांशी निगडीत सर्वजण २३ ऑगस्टच्या अधिवेशनाला उपस्थित राहावेत, असे आम्ही त्यांना आवाहन केल्याचेही सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.