

Konkan Railway Liquor Seizure: कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीस (TTE) कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मंगळवारी (18 नोव्हेंबर) रात्री नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली. प्रवासादरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या चार बेवारस बॅगा ट्रेनमधून जप्त करण्यात आल्या. कोकण रेल्वे प्रशासनाने या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि जागरुकतेचे जाहीर कौतुक केले.
मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 रोजी रेल्वेचे तिकीट तपासनीस नागराज गौडा आणि मोहन डी हे 16336 नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसच्या कोच एस-1 मध्ये त्यांच्या दैनंदिन तपासणीचे काम करत होते. रुटीन चेकिंग सुरु असताना त्यांना डब्याच्या एका भागात चार पांढऱ्या रंगाच्या बेवारस बॅगा आढळून आल्या. या बॅगा बऱ्याच वेळपासून तिथे पडून होत्या आणि कोणत्याही प्रवाशाने त्याबद्दलची मालकी स्वीकारली नाही. बॅगांचा आकार आणि वजन पाहता, त्यामध्ये दारुच्या बाटल्या भरल्या असल्याचा संशय तपासनीसांना आला. अवैध दारुची वाहतूक केली जात असावी, या संशयावरुन त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, या चारही बॅगा मडगाव (Margao) स्थानकावर एका अज्ञात व्यक्तीने ट्रेनमध्ये चढवल्या असाव्यात आणि नंतर त्या बेवारस अवस्थेत तिथेच सोडून दिल्या असाव्यात, असा अंदाज आहे. रेल्वे प्रवासादरम्यान दारु किंवा इतर अवैध वस्तूंची वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. बेवारस बॅगांमध्ये स्फोटक किंवा इतर धोकादायक वस्तू असण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाला तातडीने याची माहिती देण्यात आली.
ट्रेनमधील TTEs च्या माहितीनंतर रेल्वे सुरक्षा दल रत्नागिरी स्थानकावर सज्ज झाले. ट्रेन रत्नागिरी (Ratnagiri) स्थानकावर पोहोचताच आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी त्या चारही बेवारस बॅगा ताब्यात घेतल्या आणि त्यांची कसून तपासणी केली. तपासणीत बॅगांमध्ये मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या आढळल्याची माहिती आहे. आरपीएफने या बेवारस मालासंदर्भात जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आणि अधिक तपास करण्याची प्रक्रिया सुरु केली.
ट्रेनमधील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या त्वरित प्रतिसादाबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाने समाधान व्यक्त केले. तिकीट तपासनीस नागराज गौडा आणि मोहन डी यांच्या जागरुकतेमुळे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणारा हा अवैध प्रकार पकडण्यात यश आले. या घटनेमुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी नेहमीच सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित रेल्वे कर्मचारी, टीटीई किंवा आरपीएफला सूचित करावे, याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा दल नेहमी तत्पर असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.