

पणजी: शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्यासाठी नियुक्त केलेल्या बंगळुरू येथील ‘अक्षयपात्र’ संस्थेकडून सध्या तिसवाडी आणि बार्देश तालुक्यातील सुमारे २,१०० विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्यात येत आहे. पुढील वर्षापर्यंत आणखी तीन हजार विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’चा आहार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
काही शाळांनी त्याबाबत शिक्षण खात्याकडे मागणीही केलेली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी रविवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंसहाय्य गटांकडून शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवला जात होता.
परंतु, शिक्षण खात्याने काही गटांची बिले अनेक महिने प्रलंबित ठेवल्याने त्या गटांकडून नाराजीचा सूर उमटू लागला. नंतरच्या काळात काही गटांनी शाळांच्या अंतराचा विचार केल्यास शिक्षण खात्याकडून यासाठी मिळणारी रक्कम परवडत नसल्याचा दावा करीत माध्यान्ह आहार न देण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे शिक्षण खात्याने सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवण्यासाठी एजन्सी नेमण्याबाबत निविदा जारी केली. त्यातून बंगळुरु येथील ‘अक्षयपात्र’ची निवड झाली.दरम्यान, ‘अक्षयपात्र’ने पिळर्ण येथे सुसज्ज असे उपहारगृहही उभे केले. परंतु, धान्य न मिळाल्याने त्यांनी सुविधा दिली नव्हती.
माध्यान्ह आहारासाठी सरकारने नेमलेल्या ‘अक्षयपात्र’कडून विद्यार्थ्यांना सुरळीतपणे माध्यान्ह आहार पुरवला जात आहे. इतर काही शाळांकडूनही ‘अक्षयपात्र’च्या माध्यान्ह आहारासाठी अर्ज करण्यात येत आहेत. त्यामुळे निविदेनुसार पुढील वर्षापर्यंत आणखी तीन हजार विद्यार्थ्यांना हा माध्यान्ह देण्याचा आमचा विचार आहे.
– शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.