
पणजी: आम आदमी पक्ष यावेळी पूर्ण तयारीनिशी भाजपला हरविण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. परंतु अनेकजण भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसशी युती करावी असे म्हणतात. समजा काँग्रेसशी युती केली आणि त्यांचे काही आमदार निवडून आलेसुद्धा, तरी ते भाजपच्या गोटात पुन्हा सामील होणार नाहीत कशावरून? असा प्रश्न दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा ‘आप’च्या गोवा प्रभारी आतिषी मार्लेना यांनी केला.
गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात आतिषी बोलत होत्या. संपादक-संचालक राजू नायक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, यापूर्वी देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेसवर कितपत विश्वास ठेवायचा?
गोव्यातील भाजप किंवा काँग्रेस पक्ष सत्तेत नाही, तर काही मोजकीच कुटुंबेच सत्तेत कायम आहेत. त्यांच्याभोवतीच राजकारण फिरत आहे. गोव्यातील संसाधनाचा ऱ्हास होत चालला आहे. सर्वसामान्यांच्या समस्या, अडचणी तसेच अन्य विषयांवरून केवळ ‘आप’ सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करण्याऐवजी गोमंतकीय जनतेशी युती करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे आतिषी यांनी सांगितले.
११ पैकी काँग्रेसेच ८ आमदार फुटले. परंतु ‘आप’चे दोनच आमदार निवडून येऊनही ते भाजपच्या गोटात सामील झाले नाहीत. दोघेच असल्याने ते तसे करूही शकले असते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे गोव्यातील जनतेचा ‘आप’वर विश्वास आहे. निश्चितपणे ती आमच्यासोबत राहील. आम्ही गोव्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, असे आतिषी म्हणाल्या.
आज गोव्यातील स्थानिकांना त्यांच्या समस्यांबाबत विचारले असता ते भरभरून बोलतात. परंतु आपल्या स्थानिक आमदाराविरोधात बोलणे टाळतात. त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली आहे. वीज, पाणी, रस्त्याची समस्या देखील मांडल्या जात नाहीत. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यास आळा घालण्यासाठी, सर्वसामान्यांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी जनतेचे सहकार्य आम्हाला लाभेल, असा विश्वास आतिषी यांनी व्यक्त केला.
गोव्याच्या जनतेने काँग्रेसचे ११ आमदार निवडून देत प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिका दिली. परंतु ते निभावू शकले नाहीत. वाढत्या गुन्हेगारीविरोधात राज्यभर मशाल यात्रा काढणे असेल, रस्ते दुरुस्त करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविणे असेल किंवा इतर विषयांवरून सरकारला घेरणे असेल, आम्ही अग्रेसर राहिलो. ‘आप’ सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे आतिषी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.