

Goa Liberation Day 2025: भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, हे आपल्याला माहित आहे. मात्र, भारताच्या नकाशावरील एक अत्यंत सुंदर आणि मोक्याचा भाग असलेला गोवा तेव्हा स्वतंत्र नव्हता. भारताला स्वातंत्र्य मिळून 14 वर्षे उलटली तरी गोवा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत होता. 450 वर्षांची ही प्रदीर्घ गुलामगिरी संपवण्यासाठी भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवले. पण तुम्हाला माहित आहे का? या लढाईत भारताला केवळ लष्करीच नाही, तर जागतिक स्तरावर मुत्सद्दी लढाईही लढावी लागली होती. जेव्हा अमेरिका आणि ब्रिटनसारख्या महाशक्ती भारताच्या विरोधात उभ्या होत्या, तेव्हा सोव्हिएत युनियन (रशिया) भारतासाठी खंबीरपणे उभा राहिला होता.
19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला (Goa) पोर्तुगीजांच्या 450 वर्षांच्या राजवटीतून मुक्ती मिळाली. भारतीय सैन्याने अवघ्या 36 तासांत पोर्तुगीज सैन्याला शरण येण्यास भाग पाडले. परंतु, पोर्तुगाल आपली ही वसाहत सहजासहजी सोडायला तयार नव्हता. भारताने केलेल्या लष्करी कारवाईला पोर्तुगालने संयुक्त राष्ट्रात (UN) आव्हान दिले. पोर्तुगाल हा 'नाटो' (NATO) या संघटनेचा सदस्य असल्याने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या बलाढ्य पाश्चात्य देशांनी पोर्तुगालला उघड पाठिंबा दिला.
गोव्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात पोहोचल्यावर तिथे एक वेगळेच युद्ध सुरु झाले. अमेरिका आणि ब्रिटनने भारताने आपले सैन्य गोव्यातून मागे घ्यावे, असा ठराव मांडला. चीन, इक्वाडोर, चिली आणि ब्राझील या देशांनीही पोर्तुगालची बाजू उचलून धरली. भारत जागतिक स्तरावर एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. पाश्चात्य देशांचा असा दबाव होता की, भारताने हा प्रदेश पोर्तुगीजांना परत करावा.
भारतावर चहूबाजूंनी टीका होत असताना सोव्हिएत युनियन (रशिया) भारताच्या (India) मदतीला धावून आला. संयुक्त राष्ट्रात सोव्हिएत युनियनचे प्रतिनिधी वैलेरियन जोरिन यांनी पाश्चात्य देशांना सडेतोड उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, गोव्याचा भारताशी भूगोल, इतिहास, संस्कृती, भाषा आणि परंपरा या आधारावर अतूट संबंध आहे.
जेव्हा पोर्तुगालच्या समर्थनार्थ मांडलेला ठराव मंजूर होण्याची वेळ आली, तेव्हा सोव्हिएत युनियनने आपल्या 'व्हेटो' (Veto Power) अधिकाराचा वापर केला. या एका नकाराधिकारामुळे पाश्चात्य देशांचे भारताला रोखण्याचे सर्व प्रयत्न धुळीला मिळाले. सोव्हिएत युनियनशिवाय श्रीलंका, लायबेरिया आणि युनायटेड अरब रिपब्लिक या देशांनीही भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती.
गोवा मुक्तिसंग्रामात रशियाने दिलेल्या या पाठिंब्यामुळे भारत आणि रशियाच्या मैत्रीचा पाया अधिक भक्कम झाला. त्यानंतर 1962 चे चीन युद्ध असो किंवा 1965 चे पाकिस्तान युद्ध, रशियाने नेहमीच भारताला लष्करी आणि तांत्रिक मदत केली. जेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला प्रगत शस्त्रे दिली, तेव्हा रशियाने भारताला मिग विमाने आणि इतर महत्त्वाची शस्त्रास्त्रे पुरवली. गोव्याच्या मुक्तीसाठी रशियाने घेतलेली भूमिका आजही भारत-रशिया मैत्रीचा एक महत्त्वाचा अध्याय मानली जाते.
आज 19 डिसेंबर रोजी गोवा आपला 64वा मुक्तिदिन साजरा करत असताना भारतीय जवानांच्या शौर्यासोबतच जागतिक राजकारणात भारताची पाठराखण करणाऱ्या खऱ्या मित्राची आठवण काढणे तितकेच गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.