

Suryakumar Yadav Form Statement: भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला अद्याप फॉर्म गवसलेला नाही. त्याची बॅट पूर्णपणे शांत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत आतापर्यंत त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याचे हे प्रदर्शन आगामी टी-20 वर्ल्डकप 2026 च्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी चिंता वाढवणारे ठरु शकते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी-20 सामना जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) त्याच्या या खराब फॉर्मबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने अत्यंत स्पष्ट आणि काहीसे आश्चर्यकारक उत्तर दिले, ज्याची सध्या क्रिकेट जगतात चर्चा होत आहे.
सामना जिंकल्यानंतर सूर्याने आपल्या फॉर्मबद्दल बोलताना महत्त्वाचे मत मांडले. तो म्हणाला, "मी नेट्समध्ये खूप चांगली फलंदाजी करत आहे. जे माझ्या नियंत्रणात आहे, त्या सर्व गोष्टी करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे. जेव्हा संधी मिळेल, जेव्हा धावा करण्याची वेळ येईल, तेव्हा त्या नक्कीच होतील."
त्याने पुढे बोलताना स्पष्ट केले, "हो, मी मोठी धावसंख्या उभारण्याच्या नक्कीच प्रतिक्षेत आहे, पण मी 'आऊट ऑफ फॉर्म' नाही, फक्त सध्या माझ्या बॅटमधून धावा निघत नाहीत. मला वाटते की आम्ही रविवारी रात्रीचा हा विजय आनंदात साजरा करु. मी माझ्या फॉर्मबद्दल फारसा चिंतेत नाही."
सूर्याने व्यक्त केलेला आत्मविश्वास दर्शवतो की तो आपल्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास ठेवून आहे. लवकरच तो आपला नेहमीचा आक्रमक खेळ दाखवेल, अशी त्याला आणि टीमला अपेक्षा आहे.
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांबद्दल भारतीय कर्णधाराने मोठे विधान केले. तो म्हणाला, "मला वाटते की क्रिकेटचा हा खेळ आपल्याला खूप काही शिकवतो. एक सामना हरल्यानंतर तुम्ही संपूर्ण मालिकेत कशा प्रकारे दमदार पुनरागमन करता, हेच सर्वात महत्त्वाचे असते."
सूर्या म्हणाला, "आम्हाला मागच्या सामन्यातून (दुसरा टी-20) खूप काही शिकायला मिळाले. आम्ही पुन्हा त्याच गोष्टी करु इच्छितो, ज्या आम्ही पहिल्या सामन्यात केल्या होत्या. आम्ही तिसऱ्या सामन्यात तसेच केले आणि त्यामुळेच निकाल आमच्या बाजूने लागला."
"या सामन्यासाठी आम्ही सर्व एकत्र बसलो आणि एकत्रितपणे नियोजन केले. आमची एक महत्त्वाची टीम मीटिंगही झाली. आम्ही सराव सत्रासाठी मैदानात उतरलो आणि कटकला ज्या मूलभूत गोष्टी केल्या होत्या, त्याच पुन्हा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जास्त वेगवेगळे प्रयोग केले नाहीत'', असेही सूर्या पुढे बोलताना म्हणाला.
संघाने एकत्र येऊन केलेले नियोजन, मूलभूत गोष्टींवर दिलेला भर आणि एकत्रित प्रयत्नांमुळेच धर्मशाला येथील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवता आला, असे सूर्याने स्पष्ट केले.
भारताने (India) 101 धावांनी मोठा विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत 51 धावांनी विजय मिळवला आणि मालिका बरोबरीत आणली. तिसरा सामना टीम इंडियाने धर्मशाला येथे 7 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मालिकेत भारताने पुन्हा एकदा पकड मजबूत केली असली तरी, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने लवकरच आपल्या नेहमीच्या झंझावाती फॉर्ममध्ये परतणे भारतीय संघासाठी अत्यंत गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.