

India vs Pakistan U19 Final 2025: दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या अंडर-19 आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले. 348 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. दुबईच्या मैदानावर पहिल्यांदा गोलंदाजांनी धावांची खैरात केली आणि त्यानंतर फलंदाजांनीही शरणागती पत्करली. मात्र, या पराभवानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात कर्णधार आयुष म्हात्रे याच्या एका निर्णयावर मोठी टीका होत आहे. कर्णधाराची ही एक चूक संपूर्ण संघाला इतकी महाग पडली की, भारताचे आशियाई चॅम्पियन होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने गेला होता. अशा मोठ्या सामन्यात दडपण टाळण्यासाठी सहसा नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारण्यास प्राधान्य देतो. मात्र, कर्णधार आयुष म्हात्रेने सर्वांना धक्का देत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फायनलसारख्या दबावाच्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय भारतीय संघाला बुमरँग ठरला.
जेव्हा आयुषने पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले, तेव्हा पाकिस्तानी कर्णधाराच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. दुबईच्या खेळपट्टीवर पहिल्या सत्रात फलंदाजी करणे सोपे होते आणि पाकिस्तानने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच धावा लुटवल्या, ज्यामुळे पाकिस्तानला 347 धावांचा डोंगर उभा करता आला. जर आयुषने प्रथम फलंदाजी घेतली असती, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे मत आता जाणकार व्यक्त करत आहेत.
348 धावांचे लक्ष्य कोणत्याही स्तरावरील क्रिकेटमध्ये मोठे असते. त्यातही अंतिम सामन्याचे दडपण अधिक होते. भारतीय फलंदाजी या दडपणाखाली पूर्णपणे दबली गेली. डावाची सुरुवात करताना स्वतः कर्णधार आयुष म्हात्रे केवळ 2 धावा करुन बाद झाला. त्याच्यापाठोपाठ एरॉन जॉर्जही 16 धावांवर माघारी परतला. स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूत 26 धावा कुटल्या खरं, पण तोही संघाला संकटात सोडून पॅव्हेलियनमध्ये गेला.
विहान मल्होत्रा (7) आणि वेदांत (9) यांनीही पूर्णपणे निराशा केली. भारतीय फलंदाजांमध्ये जणू पॅव्हेलियनमध्ये परतण्याची स्पर्धाच लागली होती. संघाचे सहा फलंदाज तर दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारताकडून सर्वाधिक 36 धावा गोलंदाज दीपेशने केल्या. एकाही आघाडीच्या फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही, परिणामी संपूर्ण टीम इंडिया 156 धावांत गारद झाली.
केवळ फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीमध्येही शिस्त दिसली नाही. पाकिस्तानी फलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय आक्रमणावर हल्ला चढवला. मोठ्या धावसंख्येमुळे फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळाली. भारतीय गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात अपयश आले, ज्यामुळे धावगती सातत्याने वाढत गेली. अंतिम सामन्यात जे सांघिक प्रदर्शन अपेक्षित होते, ते भारताकडून पाहायला मिळाले नाही.
अंडर-19 आशिया चषकाचा हा पराभव भारतीय युवा संघासाठी मोठा धडा आहे. विशेषतः नाणेफेक जिंकल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेण्यात आलेले अपयश आणि फलंदाजीतील सातत्याचा अभाव यावर आता सखोल चर्चा होणे गरजेचे आहे. पाकिस्तानने या विजयासह सिद्ध केले की, मोठ्या सामन्यात दडपण कसे हाताळायचे असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.