
पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट विभागात गोव्याने निर्भेळ वर्चस्व राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. साखळी फेरीतील पाच, तसेच अंतिम लढतीत दर्शन मिसाळच्या नेतृत्वाखालील संघाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. या यशस्वी वाटचालीत संघातील स्थानिक खेळाडूंनी शानदार खेळ केला, तर ‘पाहुणे’ साफ निराशाजनक ठरले. परिणामी आगामी मोसमापूर्वी गोवा क्रिकेट असोसिएशनला गांभीर्याने विचार करावा लागेल.
रणजी करंडक प्लेट अंतिम लढतीत सोविमा येथे गोव्याने नागालँडला ३६२ धावांनी हरविले. प्लेट विभागात अव्वल ठरल्यामुळे गोव्याचा (Goa) संघ पुन्हा एकदा २०२५-२६ मोसमात रणजी स्पर्धेच्या एलिट विभागात खेळणार आहे. एलिट विभागातील ३२ संघांत २०२३-२४ मध्ये ३१व्या क्रमांकावर घसरण झाल्यामुळे यंदा (२०२४-२५) गोव्याला प्लेट विभागात खेळावे लागले होते. गोव्याने सहाही सामने जिंकून निर्विवाद वरचष्मा राखला. नागालँडचा अपवाद वगळता तुलनेत प्लेट विभागीय संघ खूपच कमजोर होते, साहजिकच गोव्याचा दबदबा अपेक्षितच होता. दुबळ्या संघांविरुद्ध खेळताना गोव्याचे तिन्ही पाहुणे अनुक्रमे अर्जुन तेंडुलकर, के. व्ही. सिद्धार्थ व रोहन कदम यांना अपेक्षापूर्ती करता आली नाही.
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन यंदा गोव्यातर्फे तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेत खेळला. त्याने चार सामन्यांत १६ गडी बाद करताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध (Arunachal Pradesh) डावात पाच (५-२५) गडी बाद करण्याची किमया साधली, परंतु तंदुरुस्तीच्या बाबतीत या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने साफ निराशा केली, परिणामी तो मणिपूरविरुद्ध पहिल्या साखळी सामन्यास व नागालँडविरुद्धच्या अंतिम लढतीस मुकला.
कर्नाटकचा के. व्ही. सिद्धार्थ यंदा गोव्यातर्फे दुसरा मोसम खेळला. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु त्या साऱ्या फोल ठरल्या. त्याने सिक्कीमविरुद्ध रांगपो येथे नाबाद शतक (१३०) शतक झळकावले, मात्र अन्य सहा डावात त्याला फक्त ३७ धावाच करता आल्या. स्पर्धेत त्याने चार सामन्यांतील सात डावात ३३.४०च्या सरासरीने अवघ्या १६७ धावा केल्या. मिझोराम व अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीसाठी त्याला वगळण्यात आले, कामगिरी खराब असूनही त्याला नागालँडविरुद्ध अंतिम लढतीत खेळविण्यात आले. त्याने दोन्ही डावांत मिळून फक्त एकच धाव केली.
कर्नाटकचाच रोहन कदम हा सलामीवीरही अपयशी यादीत राहिला. मोठी खेळी करणे त्याला जमले नाही. तो अंतिम लढतीसह तो एकूण पाच सामने खेळला, पण ३२.८५च्या सरासरीने त्याने २३० धावाच केल्या. त्याने दोन अर्धशतके केली, पण ६० धावांच्या पुढे त्याला जाता आले नाही.
सलामीस किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या २५ वर्षीय डावखुऱ्या मंथन खुटकर याने चार सामन्यांतील सात डावांत ४२.५०च्या सरासरीने २५५ धावा केल्या, तरीही त्याला नागालँडविरुद्धच्या अंतिम लढतीसाठी निवडलेल्या संघात स्थान मिळू शकले नाही. मंथनने सिक्कीमविरुद्ध शतक (१०४) नोंदविले, मिझोरामविरुद्ध त्याचे शतक पाच धावांनी हुकले.
स्नेहल कवठणकर व कश्यप बखले हे स्थानिक फलंदाज बहरले. अनुभवी २९ वर्षीय स्नेहल याने सहा सामन्यांतील सात डावांत १८९.८० च्या सरासरीने ९४९ धावा केल्या. त्याने दोन द्विशतके (२५० विरुद्ध मिझोराम, नाबाद २०२ विरुद्ध नागालँड), तर एक त्रिशतक (नाबाद ३१४ विरुद्ध अरुणाचल प्रदेश) नोंदवून गोमंतकीय क्रिकेटमध्ये नवा उच्चांक रचला. तो प्लेट विभागीय स्पर्धेचा मानकरी ठरला. २६ वर्षीय कश्यपने संधीचे सोने केले. स्पर्धेतील तीन सामन्यानंतर त्याला मिझोरामविरुद्ध पदार्पणाची संधी लाभली. नंतर अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्रिशतक (नाबाद ३००), तर नागालँडविरुद्ध अर्धशतक (नाबाद ७९) व शतक (१६१) नोंदविले. कश्यपने तीन सामन्यांतील चार डावांत २७६.५०च्या सरासरीने ५५३ धावा नोंदविल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.