

चेन्नई: पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा झाली आणि महान फलंदाज विराट कोहली व रोहित शर्मा निवृत्त झाले तर एकदिवसीय प्रकारासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील, असे मत माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने व्यक्त केले आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत असल्यामुळे विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे; परंतु वाढत्या टी-२० लीग आणि कसोटी सामन्याचे महत्त्व अधोरेखित असताना ५०-५० षटकांचा हा प्रकार लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर गटांगळ्या खात आहे, असे अश्विनचे म्हणणे आहे.
२०२७च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर एकदिवसीय प्रकाराचे भवितव्य कसे असेल, याबाबत मी साशंक आहे. मी विजय हजारे करंडक स्पर्धेचा फॉलोअर आहे; परंतु मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० स्पर्धा अधिक प्रमाणात फॉलो करत आहे, असे अश्विन आपल्या यूट्युब चॅनेलवर म्हणाला.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांना नेमके कोणते क्रिकेट पाहायचे आहे, याचा अभ्यास करायला हवा. कसोटी क्रिकेटसाठी वेगळा प्रेक्षकवर्ग आहे आणि त्याची पारंपरिक लोकप्रियता आहे; परंतु लोकप्रियतेमध्ये आता एकदिवसीय प्रकाराची जागा कमी होत आहे. यातच विराट आणि रोहित या प्रकारातूनही निवृत्त झाल्यावर ५०-५० षटकांच्या क्रिकेटचे भवितव्य अंधारमय असेल. विराट आणि रोहित या दोघांनी मिळून या प्रकारात ८६ शतके केलेली आहेत.
रोहित आणि विराट विजय हजारे स्पर्धेत खेळत असल्यामुळे लोकांनी त्यांचे सामने पाहण्यास सुरुवात केली. खेळ हा खेळाडूंपेक्षा नेहमीच मोठा असतो, हे सत्य असले तरी हे दोघे खेळत असताना खेळाची लोकप्रियता अधिक वाढत असते, हे तेवढेच सत्य आहे, असे अश्विन म्हणतो.
विजय हजारे ही राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धा आहे. रोहित-विराटचा अपवाद केल्यावर यंदाच्या या स्पर्धेकडे कोणाचे लक्ष राहिले नसते, आता हे दोघेही निवृत्त झाल्यानंतर या स्पर्धेची किती चर्चा होत राहील, याचा सर्वांनी विचार करावा, असेही अश्विनने म्हटले आहे.
अश्विन पुढे म्हणतो, एक काळ असा होता, की एकदिवसीय प्रकाराचे महत्त्व अधिक होते. डाव कशाप्रकारे उभारावा किंवा सावरावा, याचे धडे महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूंनी दिली. डावाच्या मधली १० ते १५ षटके तो एकेरी-दुहेरी धावांवर भर द्यायचा आणि नंतर अंतिम षटकांत टोलेबाजी करायचा.
आता धोनीसारखे खेळाडू नाहीत. दोन-दोन चेंडूंचा वापर केला जातो, तसेच पाच क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कलमध्ये असतात. आता एकदिवसीय सामन्यांत दोन प्रकारे खेळ केला जातो. एकतर जोरदार टोलेबाजी किंवा आव्हानात्मक खेळपट्टीवर साधारणतः १२० धावांत फलंदाज बाद होतात.
अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आयसीसीने विश्वकरंडक स्पर्धांची संख्या वाढवली आहे. दरवर्षीला कोणत्या ना कोणत्या प्रकाराची विश्वकरंडक स्पर्धा होत असते, असे सांगताना अश्विनने फिफाचे उदाहरण दिले. वर्षभर त्यांच्या प्रीमियर लीग, चॅम्पियन्सन लीग, स्पॅनिश लीग, जर्मन लीग अशा मोठ्या लीग होत असतात; पण विश्वकरंडक दर चार वर्षांनीच होते, त्यामुळे या स्पर्धेचे महत्त्व वाढतच असते.
येत्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भरताच्या अमेरिका तसेच नामिबिया संघांविरुद्धचे सामन्यांना कितीसा प्रतिसाद मिळणार आहे, असाही प्रश्न अश्विनने उपस्थित केला आहे.
एकदिवसीय प्रकाराचे भवितव्य टिकवायचे असेल आणि त्याची उत्सुकता वाढवायची असेल, तर २५-२५ षटकांचे डाव करण्याची सूचना सचिन तेंडुलकरने अगोदरच केलेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.