

तिवरे गाव हे तिवरे-वरगाव पंचायतीतील, पणजीहून २० किलोमीटर आणि फोंडाहून १६ किमी. वर आहे. आमच्या गावाकडे येण्यास तुम्ही पणजीहून येऊ शकता, वा फोंडा मार्गेही येऊ शकता, पण बाणस्तारी जंक्शनवरून यावे लागेल. बाणस्तारीचा शुक्रवारचा साप्ताहिक बाजार गोव्यात प्रसिद्ध आहे. याच बाजारापुढून माशेलकडे जाताना तुम्हाला आमचे गाव लागते.
आता बाणस्तारीवरून मोठा रस्ता माशेलपर्यंत झाल्यामुळे तुम्हाला आमच्या गावचे सौंदर्य दिसणार नाही, कारण साऱ्या गाड्या धावत वेगाने निघून जातात. त्यामुळे तिवरे गावही दिसत नाही अन् गावातले नैसर्गिक सौंदर्यही दिसत नाही. बाणास्तारी बाजारनंतर प्रथम तुम्हाला तलाव दिसेल. पूर्वी हा तलाव लांबूनही नजरेत यायचा, पण आता काहींनी काठावर घरे बांधल्याने पूर्ण तलाव पाहण्यासाठी तलावाच्या जवळून जावे लागते.
येथून आमच्या गावची हद्द सुरु होते. जसजसे पुढे जाता तसतसे तुम्हाला डाळ्या - उजव्यात घरे आणि शेती दिसायला लागतात. पूर्वी या शेतात गावचे लोक दोन दोन पीके घेत असे. १९९० पर्यंत माशेलला जाताना हिरवीगार शेताची हिरवाई डोंगरच्या पायथ्यापर्यंत टेकलेली दिसायची. जाणारे-येणारे थांबून त्या शेताची हिरवाई टिपत आणि लग्नाच्या व्हिडिओमध्ये हे सीन घालून त्यास बॅकग्राउंड म्यूझीक घालून लग्नाचा व्हिडिओ सजवीत.
याच शेतात दाणे आले की, गणेश चतुर्थीनंतर पांढरेशुभ्र बगळे येऊन दाणे टिपण्यासाठी थांबत. हे दृष्य बघण्यासाठी संध्याकाळची वेळ सोयीस्कर होती. लांबून हिरव्या पानावर पांढरेशुभ्र मोगऱ्याचे कळे उगवल्यासारखे दृष्य खूपच विलोभनीय होते. पण शेती करणारी पिढी मागे राहिली अन् पुढच्या पिढीने शेतीचा हक्क ठेवला पण शेती कसायची सवय सोडली. त्यामुळे गावातील शेती आता ओसाड झाली.
बाणस्तारी- माशेल रस्ता तिवरे गावाच्या सीमेवरून जातो. पण खरा गाव आत आहे. ज्याठिकाणी मराठी शाळा आहे त्याच्या समोरच्या रस्त्याने तुम्ही आत आला की, तुम्हाला आमच्या गावची आहिस्ते-आहिस्ते दर्शन होण्यास सुरुवात होते. रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूस रांगेत बांधलेली जुनी-नवी घरे दिसू लागतात. ज्यादा तर जुन्या घराच्या समोर तुम्हाला अंगण खास दिसेल.
याच अंगणात पूर्वी आमची जाणती पिढी, शेतातील धान्य, मिरची, हळसाणे, कुळीथ सुकवीत होते. आता ती पीकें कमी झाली अन् अंगणही शेणाचे जाऊन त्यावर पेव्हर आले. बदलत्या काळाच्या या खुणा. तिवरे वरगांव हा पूर्वीपासून शेती, नारळ, काजू आणि जंगली मेळ्याने श्रीमंत गाव. येथील पिकणारे उत्पन्न घेऊन लोक बाणस्तारी बाजारात जात. येथून तेच सामान गोव्यातील अनेक शहरात-गावात विकण्यासाठी जात.
१९९०च्या पूर्वी या गावातून गावठी केळ्यांचे घड, बैलगाडीतून बाणस्तारीकडे येताना आम्ही अनेकांनी पाहिले आहे. आता हे चित्र पूर्वीसारखे दिसत नाही. पूर्वी बाणस्तारी बाजारात विक्रीला बसणारे तिवरे- वरगाव- बेतकी, भोम या गावचे लोक होते. आज हे सारे बदलून गेले आहे. गोव्याच्या शेतातील भाजी कमी अन् कर्नाटकातील भाजी- मिरची विकणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली आहे. आमच्या गावात श्री महालक्ष्मी देऊळ आहे. प्रत्येक शुक्रवारी येथे भजनाच्या कार्यक्रमात गांवकरी उत्साहाने भाग घेतात.
त्याशिवाय श्री शांतादुर्गा देवूळचा उत्सव होतो. नवरात्रोत्सव, पालखी सोहळा, वर्धापन दिन साजरा केला जातो. गावात एकही दारू विकणारे, अथवा बार नाही हे सर्व देवीच्या कृपेमुळे असं गावकरी मानतात, हेच आमच्या गावचे वैशिष्ट्य. तिवरे गाव हा शांत आणि नैसर्गिक हिरवाईने नटलेला गाव. आता गावचे गावपण कमी होत ते शहरीकरणाकडे झुकत आहे. तरीही गावच्या लोकांनी तिवरे गावची ओळख जपून ठेवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.