

मांडवी नदीच्या तिरावर वसलेले नेरूल हे माझे गाव. दाटीवाटीने उभ्या असलेल्या माडांमुळे या गावाला नेरुल हे नांव पडले असावे. नेरूल शब्दाचा अर्थ शोधायला गेल्यास नेरूल हा तामीळ शब्द आणि त्याचा अर्थ लोकांची गर्दी असा होतो. पण नेरूल हे नाव पोर्तुगीजांनी दिले असावे. हे नाव देण्याच्या आधी नेल्लूर म्हणूनही या गावाला संबोधले जायचे.
१९२५ मध्ये रिकार्डो मायकल तेलीस या व्यक्तीने लिहिलेल्या ‘फ्रिगेसिया द नेरूल’ या पुस्तकात नेल्ल म्हणजे तांदूळ उर म्हटल्यार गाव अर्थात ‘नेल्लूर’ अशी शब्दांची फोड केल्याचे आढळते. मांडवी नदीचा उगम जरी पश्चिम घाटात झालेला असला तरी मांडवीचें मुख अरबी समुद्राकडे जिथे मिळते. मांडवी आणि अरबी समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे तयार झालेला ‘सिकेर’ हा पाण्याचा फाटा नेरूल आणि कांदोळी या गावांना वेगळे करतो.
''सिकेर'' या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ ''पडीक किंवा सुकी जमीन'' असा होतो. नेरूळला कोकणीत ‘निल्ला’ असे म्हटले जाते. एकेकाळी हिंदू वस्ती असलेल्या या गावात परशुराम भूमीचा प्रभाव होता, परंतु पोर्तुगीज राजवटीत झालेल्या धर्मांतरामुळे गावाचे धार्मिक स्वरूप बदलले. आज जिथे चर्च आहे, तिथे पूर्वी देवी शांतादुर्गा नेर्लेकरिणीचे मंदिर होते. सुमारे ४०० वर्षांपूर्वी धर्मांतराच्या काळात हे दैवत नेरूळमधून हलवून पेडणे तालुक्यातील मांद्रे येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.
नेरूल हा आमचा गाव तांदूळ, भाजीपाला आणि विशेषतः समुद्रखाद्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील तिसऱ्या (शिंपले), निर्लीची बिकणा आणि काळगा यांची चव आजही जिभेवर रेंगाळणारी आहे. प्रसिद्ध कोकणी कादंबरीकारांच्या साहित्यातही या गावाचे आणि येथील घरांचे वर्णन आढळते. वेरे आणि नेरूल गावातील देवीचे भक्त पूर्वी सण–परबांच्या वेळी मांद्रें (नेर्ले) येथे जाऊन पूजा करीत असत.
सर्व सण आणि उत्सव वर्गणी काढून एकत्र साजरे केले जात. त्या काळी ये-जा करण्याची साधने फारशी नसतानाही देवीचे भक्त वेऱ्यां व नेरूल येथून गुढीपाडव्याला तसेच श्रावण महिन्यातील जत्रेसाठी मांद्रें येथे जात असत. देवीची वार्षिक जत्रा साजरी करण्यासाठी सतत ये-जा करणे कठीण झाल्याने भाविकांना तेथेच तंबूंमध्ये राहावे लागत असे. देवीचे सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतरच ते आपल्या घरी परतत.
भाविकांची ही मांद्रें येथे जाण्याची परंपरा अनेक वर्षे सुरू होती. पुढे सुमारे तीनशे वर्षांनंतर शेवटी देवीचा पुतळा तयार करून वेरें येथे स्थापन करण्यात आला. ज्या जागी हा पुतळा ठेवला गेला, त्या ठिकाणास ‘चवकी’ असे म्हणू लागले. वेरे आणि नेरूळ येथील लोक याच ठिकाणी सर्व सण-परब एकत्र साजरे करू लागले आणि देवीविषयी आपली श्रद्धा व भक्ती व्यक्त करणे त्यांना सोपे झाले.
इ.स. १९१२ मध्ये मांद्रें येथील देवी नेर्लेकरिणीला वेरे येथे आणून स्व. केशव भगवंत पै बुडबुडे यांच्या घरी तात्पुरती ठेवण्यात आले. याबाबत एक आख्यायिकाही सांगितली जाते. जेव्हा वेरेकर लोक देवीला उचलण्यासाठी गेले, तेव्हा देवी फारच जड झाली आणि उचलता येईना. मात्र काही नेर्लेकर लोकांनी हात लावल्यानंतर देवी सहज उचलली गेली. म्हणूनच देवीला ‘नेर्लेकरिणी’ असे नाव पडले. असा आमचा नेरूळ गाव आम्हास प्रिय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.