Mardol: सफर गोव्याची! ओहोळ-नाल्यांचं संगीत ऐकणारं, फुलांचा सुगंध घेऊन येणारं 'म्हार्दोळ'
गाव कधीच सोडायचा नाही, गावातच राहायचं हे शहाणपण माझ्यात कुठून आलं, देव जाणे. मी गावातच राहायचं ठरवलं. म्हार्दोळला एका छोट्याशा टेकडीच्या पायथ्याखाली मी घर बांधलं, त्या काळी सभोवती फक्त गर्द झाडी होती. कालांतराने तिथंही काही घरे उभी झाली. तशी हिरवाई अजून आहे. टेकडीच्या वर एक पाणी साठवण्याची टाकी आहे.
त्याच्याकडेने माळरान, कुरण व दाट रान. त्यात विविध वनस्पती, रानफुलं, रानफळं आहेत. काही बागायतदार पावसात तिथं वेगवेगळी पीकंही घेतात. हा आकर्षक निसर्ग आम्हाला आवडतो.
गॅलरीत बसलो तर चहुबाजूंनी हा प्रकृतीचा हिरवा चुडा डोळ्यांना एक थंडावा देतो. पाण्याचे अऩेक स्रोत आहेत. झुळूझुळू वाहणारे ओहोळ, नाले हे गांवचं प्रमुख संगीत आहे. त्या काळात विहीरी खूप होत्या. आतां त्या तुलनेने कमी. पण पावसात काही झरे, वझरे कड्याकपाऱ्यातून लयदार कोसळतात.
हे वातावरणात जीवनात एक उभारी आणते. सजीवता आणते. ते चैतन्य जगण्याला बळ देते. फक्त या निसर्गाच्या सान्निध्यात आपण राहायला हवे.
मी म्हार्दोळला युको बॅंकेत होतो, तेव्हा विविध सामाजिक स्तरातील लोकांकडे संपर्क आला. गायक, नाट्य कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, लेखक, खेळाडू, शिक्षणतज्ज्ञ असे अनेक मान्यवर भेटले.
म्हार्दोळ गाव हा नैसर्गिक तथा अशा प्रतिभावान सुपुत्रांच्या असण्याने सुंदरच दिसायचा. मला हे भाग्य लाभले. गांवचे महान साहित्यिक आणि गांधीवादी विचारवंत रवींद्र केळेकर यांना मी भाषेविषयी शब्दांच्या व्युत्पत्तीविषयी म्हणींविषयी किती तरी प्रश्न विचारले.
ते सहज दोन तीन वाक्यात मला अर्थ समजावून सांगायचे. शंकांचे निवारण करायचे. प्रश्न साधा असो की कठीण पण त्यांनी कंटाळा बिलकूल केला नाही. म्हार्दोळच्या हृदयात आहे, ते आझाद मैदान. हे मैदान आपला पोर्तुगीजपूर्व इतिहास घेऊन बोलतं.
युनायटेड क्लब स्थापन झाल्यावर खेळाच्या विकासाला दिशा मिळाली. मी त्या मैदानावर क्रिकेट खेळलो. क्रिकेट स्पर्धा व्हायच्या. फुटबॉल स्पर्धा होत. गोवाभरचे बलाढ्य संघ येत.
म्हार्दोळ म्हणजे जीवनात रंग आणि रंगत आणणारा गाव. फुलांचा सुंदर गाव. वारा फुलांचा सुगंध घेऊनच येतो. जायांच्या हंगामात तर म्हार्दोळ तेजस्वी होतं. महालसा मंदिरात कार्यक्रम चालूच असतात. संध्याकाळी एक वॉक घेऊन तिथल्या लॉनजवळच्या बाकड्यावर बसणं आणि त्या आध्यात्मिक दिव्य वातावरणात अंतर्मुख होणं हा एक अनुभव.
आपल्याला गावाला बांधून ठेवायचं. गाव देतो संस्कार आणि संस्कृती. समाधान देतो. गावाच्या केंद्रस्थानी पोषण होतं हे समजून मी गांव सोडला नाही. म्हार्दोळच्या मध्य बिंदूला बिलगून राहिलो. शहराला शहरपण नसतं. ते मी विविध शहरातील नोकरीनिमित्त झालेल्या वास्तव्यात अनुभवलं, वा! गावाला चेहरा व गावपण असतं.
उल्हास म्हार्दोळकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

