

आमचो भाई , बाप माणूस, छत्रधारी! गोव्यावर कुठलीही अडचण येवो मेरू पर्वतासारखा निश्चल ठामपणे पुढे सरसावे. ना प्रेस ना कार्यकर्त्यांचा ताफा. गोव्यावर संकट आले की खोलवर जखम झाली असा त्रागा. जबाबदारीची ज्वाळा उरात भिडे नि ती गोष्ट तडीस नेईपर्यंत जिवाला थारा नसे. तेव्हा सरकार पडेल ह्याची तमा नसे. ‘गोवेकर प्रथम’ हाच गुण आजही त्यांना जिवंत ठेवतो. त्यांच्या खांद्यावर घराघरातील अश्रू विसावलेले असतं, न्याय देणे ते पण कमिटी करून नाही तर वन मॅन आर्मी हे चित्र आता नजरेआड झाले.
क्षणाक्षणाला त्यांची आठवण गोवेकर काढतो. भाई रागावत, ‘आता कित्याक आयला?’, ‘तू हांगा किते करता’ ही त्यांची आवडती वाक्ये. तितकाच वेळ पावसाच्या सरीसारखं लगेच ‘सांग, ऐकता!’ म्हणत आधार द्यायला वटवृक्ष उभा. कार्यकर्ता त्यांना वचकून असे पण ती सावली त्याला थंडावत होती. माणुसकी रक्तात होती. कुणाचा राग काढणं शब्दाने, त्यांना जमलेच नाही. ते फक्त त्यांना भेटत.
राग, रुसवा संपले आले परत मुंगळे गुळाला डसायला. होम डिपार्टमेंट सांभाळताना कितींच्या मुस्क्या आवळल्या त्यांनी! गुन्हेगार शोध पोलिस तेव्हा कसे करत होते? नावाचा सिंघम कोणी नव्हता. नाव देण्यात अर्थ नाही आता ते रिटायर झालेत, नाहीतर होऊ घातलेत. पोलिसी ख्याक्याला इज्जत होती. आता अधिकारी वावरत असूदे फुल पँटमध्ये; पण पूर्वी हाफ पँटला किंमत होती तेवढीदेखील उरली नाही या वर्दीला किंमत. त्यांची चूक नाही. त्यांना त्यांच्यावर असलेले, त्यांची मर्जी, इच्छा सांभाळावी लागते. पर्रीकर या विचारांची उसळती ऊर्जा असावी लागते. ठाम निर्णय, अपराधाला क्षमा नाही, हा बाणा वारसा हक्काने येतो.
भाई असताना राज्यात नियंत्रण होते. आता संयम संपला. पर्रीकर त्यांच्या काळात, भाऊसाहेब आपल्या हयातीत गोव्याचा दर्जा उंचावर नेऊन गेले. आता कुणी या टिकली मारून जा समतोल राखतो तो सेंटर, धावा शर्यत असल्यासारखी. वचक शब्दात, दरारा वागण्यात होता ती भारतीय जनता पार्टी आणि आता हा फरक सहज कुणीही कुजबुजतात.
मी फक्त लोक ‘मन की बात’ बोलतात ते लिहीत आहे. मनोहरभाई सांगत, ‘हाजे मात्शे पळे किते जाता जाल्यार..’ पण ते त्यावर थांबत नसत. मीटिंग, दबाव नाही तर पाठपुरावा करत. त्यांची बुद्धिमत्ता, कौशल्य, अभ्यास ह्याचा मेळ होता म्हणून मीडिया त्यांच्या मागे होती. मीडीया, प्रेस कॉन्फरन्स ह्यात ते नव्हते. सरकार दरबार कधी भरला नाही, त्यांची जी हुजूरी करावी लागली नाही.
कधी, कुठे, कसे पोचून कुणाचा गेम करतील त्याचा नेम नव्हता. खोटं बोलताना समोरचा विचार करत असे. त्यांचे विश्वासू मातीशी वैर करणार नाहीत हे ते जाणून होते. जात, पात, धर्म लागत नव्हता. पैशाचे वारूळ कधी नाही. त्यामुळे पोखरण नाही. त्यावर साप पण नाही. विचारांची प्रगल्भता होती. धनाची कमतरता खाजगी आयुष्यात असेल, माहीत नाही. पण सरकारी खडखडाट नव्हता. पूल, रस्ते, एअरपोर्ट बांधून गोवा नकाशात ठळक दिसू लागला आणि नको असलेले दुर्दैव ‘गोंयकार’ भोगू लागले.
त्यांच्या कारकिर्दीत खूप धुळीचे पडदे आले. त्यांच्या पावलात धमक होती त्यांनी त्या किरकिरीत चाकांचा भूतकाळाचा ट्रेलर दाखवून पंक्चर केली. काही घुसमटखोर त्याला अपवाद होते. सत्तेचे चाक रुतले आणि बाहेर पडून कालांतराने परत पैलतीर गाठून शीड किनाऱ्यावर जैसे थे असा ओंडका कसं पोहून येते तसे आले.
घुसमटीच्या गोळ्या झाडून पारधी दोषी कसा होता ते सांगून फसलेलेला शिकारी हात हलवत आला. फाटकी स्वप्ने, सत्ता ही झोळीत पडली का? ठिगळ लावून रंगलेला डाव, उधळलेले लोक पर्रीकर पाहत होते. त्यात परत नवी पहाट आली दिलबर स्वप्ने, अडथळे दूर करून नवी दिशा राज्याला मिळाली. निवड चुकली अर्ध्या हळकुंडात काही न्हाऊन निघू लागले. तेव्हा लक्षात आले संस्कार रक्तात असावे लागतात. उत्पल बाह्या सरसावून संघर्षात उतरला. रिंगमास्टर उत्पलच्या यशाची परिभाषा जाणत होता.
पर्रीकर विरोधक असून त्यांचे सामर्थ्य, आत्मविश्वास विवादात्मक कधीच नव्हता. अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. अनेक योजना, प्रोजेक्ट सामान्य जीवनाशी जोडले. वेळ पडली की पालकत्व स्वीकारलं. रेल्वे ट्रॅकिंग उत्तम उदाहरण. सर्व झुगारून त्यांनी आपले रूप दाखवलं. परिपक्वपणा तो हा.
आज वाढदिवसानिमित्त या बापाचे स्मरण होते. समाधीला पाया पडताना मनात येते, हे तेज हे सोने तापून वारसा हक्काने नवीन रूप अवतरू दे. निसर्गाचा नियम पाळत परिवर्तन घडावे.
- नीना नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.