

आज जागतिक रंगभूमी दिन. रंगमंचावर उभा असो वा नसो, खरा नाटकवाला हा दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस नाटकवालाच असतो. नाटक नावाच्या गारुडाने त्याच्या अस्तित्वाला पूर्णपणे भारून टाकलेले असते. रंगमंचावरील जादूचा प्रकाश जेव्हा जेव्हा त्याच्या अंगावर पडतो तेव्हा मात्र त्याचे ते भारलेपण एक वेगळा कायापालट घेऊन ऊभे राहते. ते भारलेपण त्याच्या भोवताली स्थलकालातीत वेगळे चुंबकीय विश्व उभे करते, ज्यात प्रेक्षक खेचून जाऊ शकतात.
रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटक नावाच्या कलेचे महत्व लोकांनी विशेष समजून घ्यावे यासाठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. रंगभूमी ही प्रेक्षकांपुढे आरसा धरणारी कला आहे. हा आरसाआपल्याला हसवतो, रडवतो, कल्पना आणि चिंतन करण्यास प्रवृत्त करतो. अभिव्यक्ती आणि अविष्कार या दोन्हींसाठी रंगभूमी हे प्रभावी माध्यम आहे.
आज-काल विविध प्रसार माध्यमांमुळे रंगभूमीचे व नाट्यकलेचे महत्व उतरत चाललेले असले तरी जगातील निवडक आणि तळमळीचे नाट्य कलाकार आपापला आशय घेऊन रंगमंचाला सातत्याने संजीवनी पुरवत आले आहेत.
सिनेमा आला तेव्हा, ‘रंगभूमी आता लयास जाईल’ ही भीती सर्वप्रथम उद्गारली गेली होती. पण रंगभूमीने कुस पालटून एक रूप धारण केले आणि पुन्हा ती आपल्या दिव्य रूपात चमकू लागली.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४३ यावर्षी मुंबईत स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल थिएटर या ग्रुपने भारतातील नाट्य चळवळीला सकस आणि सुदृढ केले. गुजराती, मराठी, हिंदी नाटके आणि त्याचबरोबर लोककला यात हा ग्रुप प्रभावीपणे सक्रिय राहिला.
१९७५ यावर्षी दिल्लीत नाट्य प्रशिक्षण देणारी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना झाली. या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारतभर वेगवेगळ्या शैलीतील नाटके सादर करण्यास सुरुवात केली आणि भारतातील नाटकांचा तोंडवळा बदलला.
गोव्यात १९८७-८८ यावर्षी कला अकादमीत नाट्य विद्यालयाची स्थापना झाली आणि गोव्यातील नाट्य सादरीकरणाचा दर्जा वाढायला सुरुवात झाली. गोव्यात होणाऱ्या नाट्य स्पर्धांमधील
नाटकांचा दर्जा उंचावला. मात्र जसजशी वर्षे उलटत गेली तसतसा गोव्यातील नाट्य स्पर्धांमध्ये सादर होणाऱ्या नाटकांमधील एकजिनसी साचा प्रेक्षकांच्या डोळ्यांना खूपायला सुरुवात झाली. चमकदार
प्रकाश योजना आणि प्रभावी ध्वनी संयोजन यात नाटकाचा आशय घुसमटताना दिसू लागला. तांत्रिकदृष्ट्या प्रभावी ठरतील आणि संस्थेला बक्षीस मिळवून देतील अशा अनुवादित आणि रूपांतरित नाट्यसंहितांनी स्पर्धेला घेरून टाकले. ऐनकेन प्रकाराने बक्षीस मिळवणे संस्थांचे अंतिम ध्येय ठरू लागले.
या ध्येयाची परिणती विभत्सतेत होईल हे अपरिहार्यच होते, जे घडताना गेली काही वर्षे हळूहळू दृष्टिक्षेपात येत होते. यंदा तर कोकणी आणि मराठी या दोन्ही स्पर्धांमध्ये या बीभत्सतेच्या पातळीने कहर केला आणि या स्पर्धांची उरली सुरली विश्वासार्हता धुळीस मिळवली.
आज गोव्यात कितीतरी धगधगीत विषय आहेत, जे नाट्यलेखकांनी, नाट्यसंस्थांनी हाताळायला हवेत मात्र अशा विषयांकडे ते अपवादानेच पाहतात. स्पर्धेच्या नाटकांच्या तयारीचा, तालमीच्या वेळापत्रकाच्या एक ठरावीक फॉर्म्युल्यातच नाटकाच्या तालमी अडकून पडल्या आहेत.
नाटकासाठी वर्षभर संशोधन करून नाटकं सादर करूया ही मानसिकताच कुठे दिसत नाही. आणि आज जागतिक रंगभूमी दिन साजरा होत असताना, गोव्यात एखादी दुसरी संस्थाच आपल्या स्तरावर नाटक सादर करत आहे ही नाट्यवेडा म्हणवून घेणाऱ्या गोमंतकासाठी नामुष्कीची गोष्ट नव्हे का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.