
ऑगस्टमधल्या पहिल्या रविवारी आपण फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा करतो. यावर्षी तो 3 ऑगस्ट रोजी येतोय. जागतिक स्तरावर हा मैत्रीच्या अनमोल नात्याचे महत्व अधोरेखित करणारा हा सण 30 जुलै रोजी साजरा केला जातो.
मैत्रीबाबत आपण अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आणतो. पण एक अत्यंत महत्वाचे उदाहरण आपल्या इतिहासात लपलेले आहे . इतिहासाच्या पानांमध्ये लपलेली या महान लोकांची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण आज आपण त्यांची मैत्री आणि क्रांतिकारी कार्यातील महत्वाचे टप्पे जाणून घेऊ.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासू लोकांमध्ये नरवीर तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांचं नाव येतं. उमरठे या गावी बालपणी तानाजी युद्धनीतीचे प्रशिक्षण घेताना शिवाजी महाराजांच्या सवंगड्यांमध्ये मिसळले आणि कायमचे त्यांचेच झाले.
त्यांच्यासोबत ते खेळत, परिसर फिरत. तोरणा किल्ला घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेचे पहिले पाऊल टाकले त्या मोहिमेत तानाजी, सूर्याजी ही बंधु होतेच. त्यानंतरच्या झालेल्या सगळ्या घडामोडींमध्ये, लढायांमध्ये तानाजी मालुसरे यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
तोरणा घेतल्यावर महाराजांनी अनेक महत्वाची ठाणी आणि आसपासचे किल्ले झपाट्याने घेतले. त्यानंतर फत्तेखान हा आदिलशाहाचा पहिला सरदार स्वराज्यावर चालून आला. पण महाराजांनी आणि त्यांच्या तरुण सवंगड्यानी हा हल्ला हाणून पाडला. या सुरुवातीच्या महत्वाच्या काळामध्ये तानाजी महाराजांसोबत होतेच.
स्वराज्यावर पहिले मोठे संकट चालून आले होते ते म्हणजे क्रूर अफजलखानाचे. चिमूटभर फौजेसोबत महाराज या संकटाला सामोरे गेले. जावळीच्या खोऱ्यात, घनदाट जंगलात तानाजी इशाऱ्याची वाट बघत होते. शामियान्यात महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढल्यानंतर इशारा झाला. तानाजी मालुसरेंनी पराक्रमाची कमाल केली. सोबतच्या इवल्याश्या तुकडीने त्याने खानाच्या फौजेचे मोठे नुकसान केले. खानाच्या हजारो सैनिकांना त्यांनी यमसदनास पाठवले.
महाराजांनी संगमेश्वर जिंकल्यावर त्या परगण्याची जबाबदारी आपला विश्वासू सहकारी तानाजींकडेच दिली. तिथले प्रशासन त्यांनी उत्तम सांभाळले. तिथल्या रस्त्यांची अवस्था खराब होती. महाराजांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी संगमेश्वर प्रांतातील रस्ते दुरस्तीचे कामही पाहिले. यादरम्यान सूर्याजी सुर्वेने एकदा हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मावळे जरा गडबडले. शत्रू मुसंडी मारतो आहे ही लक्षात येताच तानाजींनी आघाडीवर जाऊन लढून सूर्याजीच्या सैन्यास पिटाळून लावले होते.
पुरंदर तहानंतर कोंढाणा घेताना महाराज स्वत: मोहिमेवरती चाललेत हे लक्षात येताच तानाजींनी ही जोखीम स्वीकारली. पुत्र रायबाचे लग्न बाजूला ठेवून त्यांनी कोंढाणा गडावर स्वारी केली. बेहद पराक्रम गाजवला आणि कोंढाणा स्वराज्यात पुन्हा सामील केला. याच मोहिमेत त्यांना वीरमरण आले. आपल्या बालसवंगड्याच्या मृत्यूची बातमी एकूण महाराज हळहळले. मालुसरे कुटुंबाला त्यांनी पूर्ण आधार दिला. पुढे रायबाचे लग्न लावून देण्यातही छत्रपती शिवरायांनी महत्वाची भूमिका बजावली.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यापासून, लाल महालापासून असलेली मैत्री त्यांनी जपली आणि सोबत स्वराज्यासाठी झोकूनही दिले. महाराजांच्या महत्वाच्या मोहिमा तानाजींशिवाय अपुऱ्या असत आणि महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न तानाजी स्वत:चे मानत. एका उद्देशाप्रती असलेली ही मैत्री आदर्शवत आहे. या दोन महान वीरांना, त्यांच्या मैत्रीला मानाचा मुजरा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.