
संजय घुग्रेटकर
यंदा वरूणराजाने कांहीशी विश्राती घेतली असली तरी माशेल पंचक्रोशीतील श्री देवकीकृष्ण मैदानावर चिखलाने माखलेले आबालवृद्ध गोविंदा ओळखणेही कठीण झाले होते. ‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल’ अशा गजरात नाचत-खेळत होणारा चिखलकाला-गोपाळकाला अविस्मरणीय ठरला. हरिनामाचा जयघोष करीत देवतांना नमन केल्यानंतर ‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल’ अशा गजरात नाचत चिखलकाल्याला आबालवृद्धांनी सुरुवात केली आणि काही क्षणात सगळेच गोविंदा लाल मातीच्या चिखलात एकरूप झाले. दोन वर्षांच्या छोट्या मुला-मुलींपासून ते ९० वर्षांचे ज्येष्ठही त्यात सहभागी झाले होते.
उड्या मारत नाचणे, चेंडू फेक, चिखलातील मनोरंजक चक्र, नवरा-नवरी बनवून विवाह करणे असे विविध खेळ यावेळी खेळले गेले. जमिनीवर बसून दोन गटात रंगणारी आरोप प्रत्यारोपाची मजा काही वेगळीच होती. दहीहंडी, एकमेकांना चिखल लावणे, चिखलात लोळणे, यासारखे प्रकार प्रेक्षकवर्गही बेभान होऊन अवलोकन करीत होता. पर्यटनमंत्री रोहन खंवटे तिसऱ्यांदा चिखलकाल्यात सहभागी झाले होते आणि शेवटपर्यंत प्रत्येक खेळात त्यांचा सहभाग राहिला.
सोमवारी, सकाळी १२ वाजल्यापासून माशेल-देऊळवाडा येथील व इतर मंडळींचा सहभाग असलेल्या चिखलकाला-गोपाळकाल्याला सुरवात झाली. आषाढी एकादशीदिनी देवकीकृष्ण मंदिरातील भजनी सप्ताहाची सांगता चिखलकाला खेळून केली जाते. भजन संपल्यानंतर चिखलात खेळण्यापूर्वी आसपासचे लोक खेळणाऱ्यांना तेल लावतात.
‘गोपाळ गडी या रे’ असे म्हणत सर्व लोक एकत्र येऊन विठ्ठलाचा गजर करीत मंदिराला प्रदक्षिणा घालतात. किमान तीन-चार शतकांचा इतिहास या उत्सवाला असून त्यात लोकगीते, पारंपरिक खेळ, नाच-गाणी अशा विविध प्रकारांचा त्यात समावेश आहे. श्रीकृष्णाच्या बालक्रीडांशी निगडीत असा हा उत्सव असून आजही त्याचे स्वरूप बदललेले नाही.
अतिथी देवो भव! ही आपली ओळख आहे, ग्रामीण गोवा, आध्यात्मिक गोवा, दैवदैवतांचा गोवा, निसर्गसंपन्न गोमंतभूमी अशी वेगळी ओळख जगभरातील पर्यटकांना होत असून गोव्यात म्हणजे बाराही महिने पर्यटन मौसम असतो. याचा लाभ पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. जगात अनोखा असलेला चिखलकाला फक्त गोमंतकात, तो ही माशेलमध्ये साजरा केला जातो.
- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री
पिंपळाच्या कट्टय़ावर गव्हांचे पीठ व नारळापासून तयार केलेला ‘बोल’ हा खाद्यपदार्थ व इतर खाऊ भाविकांच्या गर्दीमध्ये फेकला जात होता. ते मिळविण्यासाठी सर्वांमध्ये चढाओढ होती. काहीजण हे पदार्थ न फेकता हातात देत होते. पावसातही ‘बोल’ सर्वांना देण्यासाठी अनेक जण धडपडत होते.
गोव्यात पर्यटन म्हणजे फक्त समद्र किनाऱ्याचे दर्शन नाही, तर येथील संस्कृती, संस्कार, परंपरा महत्वाच्या आहेत. त्यांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यटन खात्यातर्फे चिखलकाला महोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य केले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.