

Pakistan Two Front War: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली. मागील काही काळापासून सतत चिथावणीखोर विधानांमुळे चर्चेत असलेले आसिफ यांनी दावा केला की, त्यांचा देश 'दोन आघाड्यांवरील युद्ध' लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.' आसिफ यांनी एका जाहीर निवेदनात म्हटले की, पाकिस्तानचे लष्कर पूर्वेकडील सीमेवर भारताशी आणि पश्चिमेकडील सीमेवर अफगाण तालिबानशी युद्ध लढण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
ख्वाजा आसिफ यांचे हे वक्तव्य मंगळवारी (11 नोव्हेंबर) इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर आले. या हल्ल्यात 12 लोक ठार झाले, तर 36 जण जखमी झाले. या घटनेच्या एक दिवस आधी वझिरीस्तानमध्ये (Waziristan) देखील स्फोट झाला. या हल्ल्यांसाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानला जबाबदार धरले, तसेच भारताकडेही बोट दाखवले.
एका कार्यक्रमात बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, "आम्ही दोन आघाड्यांवर युद्ध करण्यासाठी तयार आहोत. आम्ही पूर्वेला भारत आणि पश्चिमेला अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. अल्लाहने पहिल्या टप्प्यात आमची मदत केली तशीच दुसऱ्या टप्प्यातही मदत करेल. आम्ही दोन्ही आघाड्यांवर नक्कीच यश मिळवू."
ख्वाजा आसिफ मागील काही महिन्यांपासून सातत्याने चितावणीखोर वक्तव्ये करत आहेत. खासकरुन ते आपल्या वक्तव्यातून भारत आणि अफगाणिस्तानला लक्ष्य करत आहेत. आसिफ यांचा आरोप आहे की, पाकिस्तानमध्ये होणारी हिंसा आणि दहशतवादी हल्ल्यांमागे अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेतलेले दहशतवादी आहेत. ते पुढे म्हणतात की, या दहशतवाद्यांना भारताकडूनही मदत मिळत आहे. आसिफ यांनी वारंवार हा दावा केला आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बुधवारी नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना दावा केला की, अफगाणिस्तान आणि भारत त्यांच्या भूमीवर हल्ले घडवून आणत आहेत. शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटाचे खापर थेट भारतावर फोडले. इतकेच नाही तर शरीफ यांनी अफगाण तालिबानलाही दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेण्याची धमकी दिली. नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, "पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये बाह्य शक्तींचा हात आहे, हे आता रहस्य राहिलेले नाही. दक्षिण वझिरीस्तानमधील वाना (Wana) आणि इस्लामाबादमध्ये झालेल्या हल्ल्यांवरुन दिसते की, हे हल्ले घडवणारे सीमेपलीकडे बसले आहेत आणि ते एकमेकांना सहकार्य करत आहेत."
पाकिस्तानच्या उच्च नेत्यांकडून एकाच वेळी भारतावर आणि अफगाणिस्तानवर आरोप करण्यात आल्यामुळे या दोन शेजारी राष्ट्रांसोबतचे तणाव वाढण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.