
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धक्कादायक कबुली दिली आहे. ब्रिटनच्या स्काय न्यूजशी बोलताना ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले की, पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आणि दहशतवाद्यांना फंडिंग देण्याचा जुना इतिहास राहिला आहे. स्काय न्यूजशी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही गेल्या 30 वर्षांपासून अमेरिकेसाठी हे घाणेरडे काम करत आहोत.
दरम्यान, भारतासोबत युद्धाची भाषा बोलणारे ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचे अस्तित्व नाही. ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले की, भूतकाळात या दहशतवादी संघटनेचे पाकिस्तानशी संबंध राहिले आहेत, मात्र आता ही संघटना पाकिस्तानात नाही. आसिफ पुढे म्हणाले की, लष्करचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे समोर आले म्हणून आम्ही या संघटनेला मदत करतो असे होत नाही.
मुलाखतीदरम्यान, जेव्हा ख्वाजा आसिफ यांना विचारण्यात आले की लष्करमधून पुढे आलेल्या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यावर ख्वाजा म्हणाले की, जेव्हा पालक संघटनाच अस्तित्वात नसले तर ऑफशूट संघटनेचं काय?
ख्वाजा यांना पुढे विचारण्यात आले की, तुम्हाला असे वाटते का की पाकिस्तानचा या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि फंडिंग पुरवण्याचा इतिहास राहिला आहे? यावर ख्वाजा आसिफ यांनी उत्तर देताना मान्य केले की, पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत आला आहे.
आसिफ म्हणाले, "आम्ही गेल्या तीन दशकांपासून अमेरिका आणि ब्रिटनसाठीही हे घाणेरडे काम करत आलो आहोत, परंतु ही आमची चूक होती त्यामुळे आमचे नुकसान झाले.''
आसिफ पुढे म्हणाले की, 'जर पाकिस्तान सोव्हिएत युनियनविरुद्ध अफगाणिस्तानात सामील झाला नसता किंवा 9/11 मध्ये सहभागी झाला नसता, तर कोणीही पाकिस्तानकडे बोट दाखवू शकले नसते.'
दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी पहलगाम हल्ल्याला भारताचे 'षड्यंत्र' म्हटले. आसिफ म्हणाले की, आमच्या एजन्सींना वाटते की भारतच हे करत आहे. स्काय न्यूजशी बोलताना त्यांना विचारण्यात आले की, पाकिस्तानचा दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचा इतिहास राहिला असून यावर तुमचे काय म्हणणे आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना ख्वाजा यांनी जगातील बलाढ्य देशांना दोष देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, या भागात जे काही घडत आहे यासाठी पाकिस्तानला दोष देणे बलाढ्य देशांसाठी सोपे आहे. 80 च्या दशकात जेव्हा आम्ही सोव्हिएत युनियनविरुद्ध त्यांच्या वतीने लढलो, तेव्हा आजचे हे सर्व दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये आनंद उपभोगत होते. त्यानंतर 9/11 चा हल्ला झाला. पुन्हा एकदा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. मात्र, त्यावेळी आमच्या सरकारने चूक केली. अमेरिकेने या दहशतवाद्यांचा वापर 'प्रॉक्सी' म्हणून केला. हे एकाच संघटनेचे लोक होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.