

India vs South Africa Pitch Report: भारतीय महिला संघ आज (2 नोव्हेंबर) आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी रंगणार आहे. महिला विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे.
यापूर्वी, 2005 च्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 98 धावांनी, तर 2017 मध्ये इंग्लंडकडून केवळ नऊ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिल्या विजेतेपदाच्या (Maiden Title) शोधात भारतीय संघ तिसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे.
अंतिम सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकल्यास (Toss) प्रथम गोलंदाजी (Bowling) करणे पसंत करेल, अशी शक्यता आहे. कारण, उपांत्य सामन्यात (Semi-Final) लक्ष्याचा यशस्वी पाठलाग (Chasing Target) करुनच भारताने विजय मिळवला होता. अंतिम सामन्याचा दबाव आणि खेळपट्टीचा अंदाज पाहता हा निर्णय योग्य ठरु शकतो.
यंदाच्या स्पर्धेत हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघासाठीचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध सलग दोन विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीतील स्थान मजबूत केले होते. यानंतर संघाने सलग तीन सामने गमावले, पण ते सर्व सामने अत्यंत चुरशीचे होते. भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, असे वाटत असतानाच यजमान संघाने न्यूझीलंडचा (New Zealand) 53 धावांनी पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.
गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहत भारताने बाद फेरीत (Knockout) प्रवेश केला आणि उपांत्य फेरीत त्यांचा सामना सात वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी (Australia) झाला. या सामन्यात यजमान संघाने अविश्वसनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला पाच गडी राखून पराभूत केले. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग (339 धावांचे लक्ष्य) करताना भारताने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. आता उत्साहित भारतीय संघ अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. प्रोटियाज संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीत इंग्लंडचा 125 धावांनी पराभव केला होता.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमची खेळपट्टी लाल मातीची (Red Soil) आहे, जी साधारणपणे सर्वांना मदत करते. ही सहसा फलंदाजीसाठी अनुकूल (Batting Friendly) असते आणि तिच्यात चांगला उसळी (Bounce) आणि वेग असतो. याचा अर्थ, सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना (Fast Bowlers) खेळपट्टीकडून चांगली मदत मिळते आणि जसजशी इनिंग पुढे सरकते, तसतसे फिरकी गोलंदाज (Spinners) प्रभावी ठरतात.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्यासाठी तीच खेळपट्टी वापरली जाईल जी भारताने लीग टप्प्यात न्यूझीलंडविरुद्ध वापरली होती. हे खरे ठरल्यास, यजमान संघासाठी ही आनंदाची बातमी असेल, कारण त्या खेळपट्टीने भारताला मोठा पाठिंबा दिला होता. भारताने या स्पर्धेत या मैदानावर तीन सामने खेळले असून, सर्व सामन्यांमध्ये दबदबा कायम ठेवला आहे. लीग टप्प्यात न्यूझीलंडला हरवले आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला. बांगलादेशविरुद्धचा सामना भारत जिंकण्याच्या जवळ असताना तो पावसामुळे रद्द झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.