

Team India Playing 11: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनीमध्ये होणार आहे. पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकल्यामुळे त्यांनी या मालिकेवर आधीच कब्जा केला आहे.
आता तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा संघ भारताचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असेल, तर दुसरीकडे टीम इंडियाला निदान हा शेवटचा सामना जिंकून आपली प्रतिष्ठा वाचवायची आहे. पहिले दोन सामने पाहता टीम इंडियाला हा शेवटचा सामना जिंकण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान दोन महत्त्वाचे बदल करण्याची गरज जाणवत आहे. जुन्याच संघासोबत ऑस्ट्रेलियाला हरवणे कठीण आहे.
युवा फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून सलग दोन सामने हरली. गिलच्या वनडे कर्णधारपदाचा हा पहिला अनुभव असून त्याचे असे निराशाजनक पदार्पण (Debut) होईल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. गिल जो संघ खेळवत आहे, त्यात अनेक त्रुटी आहेत, पण तो बदल करण्याचे प्रयत्न करताना दिसत नाही. गिल स्वतः संघ निवडतो की त्याला तयार संघ दिला जातो, हे त्यालाच माहीत; पण तिसऱ्या सामन्यात त्याला दोन मोठे बदल करणे आवश्यक आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवचे (Kuldeep Yadav) नाव कोणत्याही परिस्थितीत असले पाहिजे. कुलदीप सध्या उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे आणि तो संघात नसणे हे समजण्यापलीकडचे आहे. अर्थात, फलंदाजीमध्ये कुलदीप फारशी मदत करु शकत नाही. परंतु, जर वरचे फलंदाज धावाच करु शकले नाहीत, तर कुलदीपच्या गोलंदाजीचा तरी काय उपयोग होणार? मात्र, कुलदीप विकेट्स घेऊन संघाला विजयाच्या दिशेने नेऊ शकतो. त्यामुळे त्याच्या जागी खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसावे लागू शकते.
याव्यतिरिक्त, टीम इंडियाला (Team India) आणखी एक बदल करण्याची गरज आहे, तो म्हणजे हर्षित राणा याला बाहेर बसवणे. हर्षित काही धावा करत असला तरी, त्याला संघात धावा करण्यासाठी ठेवले आहे की विकेट्स घेण्यासाठी, हा प्रश्न आहे. जर त्याला धावा करण्यासाठी ठेवले असेल, तर एखाद्या प्रॉपर फलंदाजालाच संधी द्यायला हवी होती. पण जर गोलंदाजीसाठी ठेवले असेल, तर त्याला खूप मार पडत आहे. अशा परिस्थितीत, प्रसिद्ध कृष्णाला (Prasidh Krishna) संधी देणे अधिक योग्य ठरु शकते. जर संघात असे काही बदल झाले, तर टीम इंडियाच्या विजयाची शक्यता वाढू शकते. बाकी संघात फार मोठे बदल करण्याची गरज दिसत नाही.
तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टिरक्षक), नितीश रेड्डी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.