

S Jaishankar IIT Madras Interviw: परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी (2 जानेवारी) IIT मद्रास येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारताची प्राचीन संस्कृती, लोकशाही, कोरोना लस धोरण आणि शेजारील देशांशी असलेले संबंध यावर सविस्तर भाष्य केले. भारताने कोरोना काळात जगाला ज्या प्रकारे मदत केली, त्याचे महत्त्व अधोरेखित करताना जयशंकर यांनी पाश्चात्य देशांच्या स्वार्थी भूमिकेवरही कडाडून टीका केली. भारत ही केवळ एक लोकशाही नाही, तर ती एक महान प्राचीन संस्कृती आहे जी आज आधुनिक जगाचे नेतृत्व करत आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोना (Corona) लसीबद्दल बोलताना डॉ. जयशंकर म्हणाले की, "माझ्या संपूर्ण कारकिर्दीत लसीच्या वितरणाने जगावर पडलेला इतका भावनिक प्रभाव मी कधीच पाहिला नाही. आजही अनेक देशांतील लोक लसीची पहिली खेप आठवून गहिवरतात. कोविड हा एक अत्यंत वाईट काळ होता, पण भारताने तो यशस्वीपणे मागे टाकला. त्याचवेळी विकसित पाश्चात्य देशांनी आपल्या लोकसंख्येच्या आठपट अधिक लसींचा साठा करुन ठेवला होता, परंतु गरीब आणि लहान देशांना ते 10 हजार डोस देण्यासही ते तयार नव्हते."
ते पुढे म्हणाले की, "आज लॅटिन अमेरिका, कॅरिबियन आणि पॅसिफिकमधील लहान बेट राष्ट्रांचे लोक सांगतात की, जर भारताने मदत केली नसती, तर आम्हाला लसीचा गंधही मिळाला नसता. आम्ही 1.4 अब्ज लोकांची जबाबदारी सांभाळूनही लहान देशांना 1-2 लाख डोस देऊन आमची एकता दाखवून दिली. आपण जगातील सर्वात कार्यक्षम लस उत्पादक होतो, हे आपण विसरता कामा नये."
त्याचवेळी, शेजारील देशांसोबतच्या धोरणांवर भाष्य करताना जयशंकर यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्याचा उल्लेख केला. बांगलादेशातील अशांततेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारत आपल्या शेजाऱ्यांना केवळ मित्र मानत नाही तर त्यांच्या संकटात खंबीरपणे उभा राहतो. "मी दोन दिवसांपूर्वी बांगलादेशला गेलो होतो आणि भारताच्या वतीने माजी पंतप्रधान बेगम खलिदा जिया यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालो. आमचे शेजारी विविध स्वभावाचे आहेत. जर एखादा शेजारी चांगला असेल किंवा किमान आपल्याला त्रास देत नसेल, तर त्याला मदत करणे हा आपला स्वभाव आहे," असे ते म्हणाले.
कोविड काळात बहुतेक शेजारील देशांना लसीची पहिली खेप भारताकडूनच मिळाली होती. श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जेव्हा आयएमएफसोबतचा त्यांचा करार अत्यंत धीमे गतीने चालला होता, तेव्हा भारताने पुढाकार घेऊन 4 अब्ज डॉलर्सचे पॅकेज दिले. "बहुतेक शेजारी जाणतात की भारताची प्रगती ही एका वाढत्या लाटेसारखी आहे. जर भारत वाढला तर सर्वच वाढतील," असा संदेश त्यांनी दिला.
डॉ. जयशंकर यांनी भारताच्या (India) लोकशाही मूल्यांवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "भारताने लोकशाही स्वीकारुन या संकल्पनेला जागतिक मान्यता मिळवून दिली. जर आपण लोकशाही स्वीकारली नसती, तर ही संकल्पना केवळ काही भागापुरती मर्यादित राहिली असती. आपण जगाला कधीही शत्रू किंवा धोका म्हणून पाहिले नाही, तर आपण 'वसुधैव कुटुंबकम' मानतो. आपली संस्कृती आणि मूल्ये जगासमोर मांडणे हे आपले कर्तव्य आहे, पण हे सर्व मैत्रीपूर्ण भागीदारीतूनच शक्य आहे."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.