
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात कधी कारवाई करणार असे विचारले जात होते. मात्र या हल्ल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. भारतीय लष्कराने यशस्वीरिस्त्या हे ऑपरेशन राबवले. भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईनंतर सरकार आणि भारतीय लष्कराच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग उपस्थित होत्या.
यावेळी सांगण्यात आले की, बुधवारी (7 मे) रात्री 1.05 ते 1.30 दरम्यान 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले. यादरम्यान, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत घुसून केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पीओकेमधील पाच तर पाकिस्तानमधील (Pakistan) चार दहशतवाद्यांचे अड्डे भारताने उद्ध्वस्त केले.
पत्रकार परिषदेत संसदेवरील हल्ला, मुंबई हल्ला, पुलवामा हल्ला आणि पहलगाम हल्ल्याची दृश्ये दाखवण्यात आली. सर्वप्रथम परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यानंतर, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ची संपूर्ण माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांना टार्गेट करण्यात आले. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले. दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणे ओळखून ती नष्ट करण्यात आली. या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. हे दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड होते. विश्वासार्ह गुप्तचर माहितीच्या आधारे ऑपरेशन सिंदूरसाठी हे टार्गेट निवडण्यात आले होते. यामध्ये, निवासी क्षेत्रे आणि सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवण्याचा उद्देश नव्हता.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले, ''22 एप्रिल 2025 रोजी लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तान-प्रशिक्षित दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांना निशाणा बनवले. 25 भारतीय आणि एका परदेशी नागरिकाची भ्याड हत्या करण्यात आली. मुंबई हल्ल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात झालेल्या नागरिकांच्या मृत्यूची ही सर्वात मोठी घटना होती. या हल्ल्यात, तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्ववत होत असलेल्या सामान्य परिस्थितीला अडथळा निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. गेल्या वर्षी येथे सुमारे 75 दशलक्ष पर्यटक आले होते.''
मिस्री यांनी पुढे सांगितले की, ''भारताला (India) सीमापार हल्ले रोखण्याचा आणि त्यांचा प्रतिकार करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. ही कारवाई त्याच अधिकाराचा एक भाग आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट करण्यात आले.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.