Chhattisgarh Crime: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्याच्या पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे नेते असीम राय यांच्या हत्येच्या आरोपाखाली काँग्रेस नेते आणि पखंजूर नगर पंचायतीच्या अध्यक्षासह 11 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नगर पंचायत अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता, त्यासाठी अध्यक्ष भाजप नेत्याला जबाबदार धरले जात होते. खुर्चीसाठीचं भांडणं या खुनाचं कारण ठरलं.
कांकेरचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगर पंचायत अध्यक्ष असीम राय यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस नेते आणि नगर पंचायत अध्यक्ष बप्पा गांगुली (57) यांना 7 तारखेला पखंजूर शहरात अटक केली. या महिन्यात काँग्रेस (Congress) पक्षाचे नगरसेवक विकास पाल (47) आणि जितेंद्र बैरागी (37) सह 11 जणांना अटक केली आहे. असीम राय यांच्यावर गोळ्या झाडणारा विकास तालुकदार फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पटेल यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, 7 जानेवारीला पखंजूरच्या पुराणा बाजार भागात असीम राय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान, एसआयटीने पखंजूर शहरातील सर्व सीसीटीव्हीचे पुनरावलोकन केले आणि त्यानंतर असे आढळून आले की घटनेच्या दिवशी मोटारसायकलवरुन आलेल्या दोन आरोपींनी असीम राय त्यांच्या कॉम्प्लेक्समधून घरी जात असताना त्यांचा पाठलाग केला आणि मोटारसायकलवर मागे बसलेल्या व्यक्तीने राय यांच्यावर गोळी झाडली.
पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीची ओळख विकास तालुकदार म्हणून केली आणि नंतर त्याचा एक मित्र नीलरतन मंडल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान मंडलने हत्येचा कट रचल्याची माहिती पोलिसांना दिली. पखंजूर भागातील रहिवासी सोमेंद्र मंडल, सुरजित आणि रिपन यांनी नीलरतनला सांगितले होते की, काँग्रेस नेते बप्पा गांगुली, विकास पाल आणि जितेंद्र बैरागी यांना भाजप नेते असीम राय यांना मारायचे आहे. यानंतर नीलरतनने त्याचा चुलत भाऊ शार्प शूटर विकास तालुकदार आणि जयंत बिस्वास यांची असीम राय यांच्या हत्येसाठी सोमेंद्रशी ओळख करुन दिली होती.
नीलरतन, विकास आणि जयंत यांनी राय यांच्या हत्येसाठी सात लाख रुपयांची सुपारी घेतली होती. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नंतर पोलिसांनी सोमेंद्र मंडलला ताब्यात घेऊन चौकशी केली. समेंद्रने असीम यांच्या हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर नगर पंचायत अध्यक्ष बप्पा गांगुली यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला आणि त्यांची खुर्ची धोक्यात आली. त्याने पुढे सांगितले की, पाखंजूर येथील हॉटेलचे बेकायदेशीर बांधकाम देखील पाडले जाईल अशी भीती विकास पाल याला वाटत होती आणि या दोघांनी असीम राय यांना जबाबदार धरले.
त्याने सांगितले की, जितेंद्र बैरागी याचे असीम राय यांच्याशी जुने वैर होते आणि त्यालाही राय यांना मार्गातून हटवायचे होते. यानंतर तिघांनीही राय यांच्या हत्येची जबाबदारी सोमेंद्रवर सोपवली. बप्पा गांगुली आणि विकास पाल यांनी हत्येसाठी पैशाची व्यवस्था केली आणि जितेंद्र बैरागीला राय यांना भेटण्याची जबाबदारी देण्यात आली. पोलीस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, पैसे मिळाल्यानंतर नीलरतनने एक पिस्तूल खरेदी केले आणि विकास तालुकदार आणि त्याचा अन्य सहकारी गोपीदास याने ही घटना घडवून आणली. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पोलिसांनी गोपीदासच्या घरातून एक मोटरसायकल, तीन लाख रुपये आणि काही वस्तू जप्त केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.