

Modi Government High Alert For Indian Seafarers Safety: मध्यपूर्वेतील सागरी क्षेत्रात बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे मोदी सरकार कमालीचे सतर्क झाले आहे. भारतीय खलाशांचा जीव वाचवण्यासाठी आणि देशाच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. केंद्रीय जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या नौवहन महासंचालनालयाने होर्मुझ सामुद्रधुनी आणि ओमानच्या खाडीतील घडामोडींवर चोवीस तास बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
समुद्रातील व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे व्यापारी वाहतुकीचा धोका वाढला आहे. हे सागरी मार्ग जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने, मोदी सरकारने सर्व संबंधित यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे आणि कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. खलाशांना तात्काळ मदत मिळावी यासाठी परराष्ट्र मंत्रालय, भारतीय नौदल आणि परदेशातील दूतावास एकमेकांच्या संपर्कात आहेत.
याचदरम्यान ओमानच्या (Oman) समुद्रात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. पलाऊ देशाचा ध्वज असलेले 'एमटी सेटबेलो' हे व्यापारी जहाज ओमानमधील सोहार किनारपट्टीपासून काही अंतरावर असताना, 10 जून रोजी त्यावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या जहाजावर एकूण 28 क्रू मेंबर्स होते, ज्यामध्ये 24 भारतीयांचा समावेश होता.
ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण हल्ल्यात तीन भारतीय खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. घटनेची माहिती मिळताच भारत सरकारने वेगाने पावले उचलली. हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या त्या तिन्ही भारतीय खलाशांचे मृतदेह शोधून त्यांची ओळख पटवण्यात आली, तर जहाजावरील इतर सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुप वाचवण्यात यश आले. आता वाचवलेल्या खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी आणि मृत खलाशांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांकडे सन्मानाने सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत मृत खलाशांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. कर्तव्यावर असताना भारतीय खलाशांचा झालेला हा मृत्यू संपूर्ण देशासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले. मोदी सरकार या कठीण काळात शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सरकारी नियमांनुसार मृत खलाशांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. यासोबतच, संघर्षग्रस्त सागरी भागातून प्रवास करणाऱ्या सर्व भारतीय आणि परदेशी जहाजांवरील भारतीय खलाशांना अत्यंत सावध राहण्याचा आणि सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला.
सागरी क्षेत्रातील कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी किंवा तक्रारींसाठी सरकारने 24 तास सुरु असणारे विशेष संपर्क क्रमांक आणि हेल्पलाईन जाहीर केल्या आहेत. नागरिक थेट '+91 8657549760' या क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉलद्वारे संपर्क साधू शकतात, तसेच 'dgcommcentre-dgs@nic.in' या ईमेलवर माहिती देऊ शकतात. याशिवाय देशांतर्गत नागरिकांसाठी '1800-889-7767' हा टोल-फ्री क्रमांक देखील उपलब्ध करुन देण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या या भू-राजकीय तणावाच्या काळात मोदी सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.