

Mallikarjun Kharge Clarification on Modi Terrorist Comment: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय टीकेची पातळी खालावली असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत टोकाची आणि वादग्रस्त टीका केली. चेन्नई येथील एका पत्रकार परिषदेत बोलताना खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना 'आतंकवादी' संबोधल्याने देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला.
अण्णा द्रमुक (AIADMK) आणि भाजपच्या युतीवर निशाणा साधताना खर्गे यांनी हे विधान केले. मात्र, या विधानानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेताच खर्गे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत, "पंतप्रधान मोदी विरोधकांना धमकावतात आणि त्यांच्यात भीती निर्माण करतात, अशा अर्थाने मी ते बोललो होतो," असे स्पष्टीकरण दिले.
पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "अण्णा द्रमुक पंतप्रधान मोदींच्या सोबत कसे जाऊ शकते? ते एक 'आतंकवादी' आहेत. त्यांचा समानतेवर विश्वास नाही आणि त्यांच्या पक्षाचाही न्याय अन् समानतेच्या तत्त्वांवर विश्वास नाही. अशा लोकांशी हातमिळवणी करणे म्हणजे लोकशाही कमकुवत करणे आहे." जेव्हा त्यांच्या या 'आतंकवादी' शब्दावर पत्रकारांनी स्पष्टीकरण मागितले, तेव्हा खर्गे यांनी केंद्रातील तपास यंत्रणांचा दाखला दिला.
आयकर विभाग, ईडी आणि इतर सर्व स्वायत्त संस्था मोदींच्या हातात असून त्यांचा वापर करुन ते विरोधकांना 'दहशत' दाखवत आहेत, असा आरोप खर्गे यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना 'लबाड' संबोधत गेल्या 12 वर्षांत त्यांनी देशासाठी काहीही केले नसल्याची टीकाही केली. मोदी हे 'मनुस्मृती' आणि 'चातुर्वर्ण्य' व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे असून ते महिला आणि गरीब विरोधी आहेत, असेही ते म्हणाले.
खर्गे यांच्या या विधानानंतर भाजपने देशभर संताप व्यक्त केला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी खर्गे यांच्यावर जोरदार टीका करत देशाची माफी मागण्याची मागणी केली. गोयल म्हणाले की, "लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांना 'आतंकवादी' म्हणणे हे काँग्रेसच्या मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. काँग्रेस या थराला जाईल असे आम्हाला वाटले नव्हते. तामिळनाडूची जनता आणि देशातील नागरिक या अपमानाचा बदला निवडणुकीतून घेतील." तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनीही खर्गे यांच्यावर खालच्या स्तरावरील भाषा वापरल्याचा आरोप केला. इंडिया आघाडीचा पराभव समोर दिसत असल्याने वैफल्यातून काँग्रेस नेते अशी विधाने करत असल्याचे त्यांनी म्हटले.
तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यापूर्वी खर्गे यांनी केलेल्या या विधानामुळे निवडणुकीची सर्व समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली. खर्गे यांनी तामिळनाडूच्या जनतेला काँग्रेस-डीएमके युतीला मतदान करण्याचे आवाहन करताना राहुल गांधी हेच न्याय आणि समानतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेली ही वैयक्तिक टीका आता काँग्रेसच्या अंगाशी येण्याची चिन्हे आहेत. भाजपने या मुद्द्यावरुन काँग्रेसला (Congress) कोंडीत पकडले असून, मतदानाच्या दिवशी तामिळनाडूतील जनता या 'शब्दांच्या युद्धाला' काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.