

नवी दिल्ली: विद्यार्थी आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. ‘‘लाठीमारासाठी गृह मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत असलेले शहा हेच जबाबदार आहेत.
संसदेत येऊन यावर उत्तर देण्याऐवजी ते बंद खोलीत बसले आहेत. मात्र जास्त दिवस तुम्ही तसे बसू शकणार नाही. युवक आणि जनता तुम्हाला बाहेर खेचून काढेल,’’ अशी टिपणी खर्गे यांनी राज्यसभेत केली. त्यांच्या या विधानावरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी आता अमित शहा यांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) विधेयक राज्यसभेत सादर केले.
‘वंदे मातरम’बाबतचे विधेयक मंजूर
लोकसभेत गुरुवारी विरोधकांच्या गदारोळात ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६’ आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकानुसार ‘वंदे मातरम’चा अपमान करणे किंवा त्याच्या सादरीकरणात जाणूनबुजून अडथळा निर्माण करणे हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे. राज्यसभेने कालच (ता. २९) या विधेयकाला मंजुरी दिली होती.
मनुस्मृतीवरून खडाजंगी
‘‘अभ्यासक्रम बदलण्याचे काम सरकारकडून चालू आहे. शूद्राने वेद ऐकले तर त्याच्या कानात शिसे ओतून कान भरले जातील. वेदाचे उच्चारण त्याने केले तर जीभ कापली जाईल, असे विषय अभ्यासक्रमात येत आहेत. हा आरएसएसचा अभ्यासक्रम आहे,’’ असे खर्गे म्हणताच प्रचंड गदारोळ झाला. गिरीराज सिंह यांनी प्रतिवाद करताच काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले.