
आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण पेटल्याचं पाहायला मिळत आहे.
एमआयएमचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी लोकसभेत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून थेट सरकारला प्रश्न विचारत हा मुद्दा उचलून धरला.
सोमवारी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात विशेष चर्चा पार पडली. या चर्चेसाठी एकूण १६ तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला असून, अनेक पक्षांच्या खासदारांनी आपली मतं मांडली. यावेळी बोलताना ओवैसी यांनी आपल्या भाषणात सरकारच्या पाकिस्तान धोरणावर टीका केली.
ओवैसी म्हणाले, “पंतप्रधान स्वतः म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’, आणि दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. तुम्ही पाकिस्तानसोबत व्यापार बंद केला, हवाई आणि सागरी संपर्क बंद केला... तर मग आता कोणत्या तोंडाने आपण त्यांच्याशी क्रिकेट सामना खेळणार आहोत?”
ते पुढे म्हणाले, “मी एक नागरिक म्हणून हा सामना पाहू शकणार नाही. आमच्या जवानांचे बलिदान विसरून क्रिकेट खेळणं हा दुहेरी दृष्टिकोन नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ओवैसी यांनी केंद्र सरकारच्या पाकिस्तानविषयक धोरणावर एकंदर टीका करत, “दहशतवाद्यांना धडा शिकवायचा, पण दुसऱ्या बाजूला त्याच देशासोबत क्रिकेट खेळायचा? ही कुठली एकात्मता?” असा सवाल उपस्थित केला.
ओवैसींच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत तीव्र चर्चा रंगली आहे. काही जण खेळ आणि राजकारण वेगळं ठेवावं, असं म्हणत आहेत, तर अनेकांनी आतंरिक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट स्थगित करावं, अशी मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.